जगभरातले विचारवंत, राजकारणी, राज्यकर्ते आणि संशोधन संस्था हवामान बदलाबद्दल बरंच बोलतात, पण ‘क्लाऊड सीडिंग’बाबत गप्प का आहेत किंवा जाणूनबुजून अनभिज्ञ राहात आहेत, असा एक मुद्दा सध्या पुढे येत आहे. बदलत्या, अनियंत्रित आणि ढासळत्या हवामानाला काही संशोधनं आणि प्रयोगही कारणीभूत आहेत. हे प्रयोग वैज्ञानिक आहेत; परंतु निसर्गावर खोल परिणाम करत असतात. चीनने हवामान अनुकूल करण्यासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये जवळपास पाच दशलक्ष प्रयोग करून भरपूर पैसा खर्च केला आहे. या जुलै आणि ऑगस्टमध्ये चीनमध्ये ६४ दिवस उष्णतेची तीव्र लाट होती. अनेक भागांमधलं तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेलं होतं. मोठ्या नद्या आणि इतर जलसाठे कोरडे पडले होते. पाऊस कमी पडला तर दुष्काळाला तोंड द्यावं लागतं. आकाशात ढगांची गर्दी असते; परंतु पाऊस पडत नाही. अशा वेळी विमानातून ढगावर फवारणी करून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातो. पिकं वाचवण्यासाठी चीनने ‘क्लाऊड सीडिंग’ तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करून पाऊस पाडला. इतर अनेक देशही काही प्रमाणात प्रयोगासाठी, कधी गरजेपोटी या तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. भारतातही कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. महाराष्ट्रात दोन दशकांपूर्वी मिठाच्या फवारणीचे प्रयोग केले जात होते. ही पद्धत नक्कीच वैज्ञानिक आहे; पण ती निसर्गविरोधी आहे. संयुक्त अरब अमिरातीसाठी जुलै महिना कोरडा आणि उष्ण असतो; पण या वेळी एकाच दिवसात इतका पाऊस पडला की, वर्षभरातही तितका पाऊस पडत नाही. यामध्ये अर्धा डझनहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. तिथेही कृत्रिम पद्धती वापरल्या गेल्यापासून असं घडू लागलं.
कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात जर्मनी आणि बेल्जियममध्ये दिसली होती. तिथे मोठा पूर आला. हवामानाच्या बिघडलेल्या स्वरूपाचा संबंध केवळ तापमानाशी जोडता येत नाही. कारण हिवाळा, उष्णता, हिमवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूर अशा सर्व विनाशाची दृश्यं समोर आहेत. इथे भारतात ऑक्टोबर महिन्यात मान्सूनच्या पुनरागमनाने पूर, पावसाने अर्ध्याहून अधिक देशांमध्ये विध्वंस घडवला. पुण्यात ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचा चाळीस वर्षांचा विक्रम का मोडला, हे पाहावं लागेल. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये परतीच्या हंगामामुळे उभी पिकं उद्ध्वस्त झाली. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण उत्तराखंडमध्ये भरपूर पाऊस झाला. उत्तर प्रदेशमध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार आणि अचानक झालेल्या पावसामुळे इटावाजवळ एक धरण फुटल्याने शेकडो गावांमध्ये पाणी शिरलं तसंच आझमगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाच्या दबावामुळे कैंची धरण फुटून शेकडो लोकांची घरं बुडाली. आंबेडकर नगर आणि बाराबंकीमध्ये शरयू नदीला आलेल्या पुरामुळे हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त झाली. इतर डझनभर जिल्ह्यांमध्येही हीच स्थिती होती. मध्य प्रदेशमध्ये बनसागरचे दोन कालवे फुटले. त्याचप्रमाणे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या पावसाने संपूर्ण देशात वेगळेच रंग दाखवले.
बंगळूरुमध्ये पावसाच्या विध्वंसाने नव्वद वर्षांचा विक्रम मोडला. शेजारील नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश या देशांची परिस्थितीही आपल्यापेक्षा वेगळी नव्हती. इतर ज्ञात घटकदेखील अशा हवामान बदलाला कारणीभूत आहेत. ज्यात जंगलांचं अंदाधुंद शोषण, पर्वतांचं गिट्टीमध्ये रूपांतर, नद्यांमधून अंदाधुंद वाळू काढणं, जीवाश्म इंधन- कोळसा – पेट्रोल – डिझेल – केरोसीनच्या बेहिशेबी वापरामुळे वातावरण प्रदूषित करणं आदींचा समावेश आहे. ‘क्लाऊड सीडिंग’ आणि इतर हवामान नियंत्रण तंत्रांचे परिणाम सातत्याने चर्चेत राहिले आहेत. त्यावरही शास्त्रीयदृष्ट्या गांभीर्यानं चर्चा करावी लागेल. आपण कृत्रिम पाऊस, बर्फवृष्टी नियंत्रण, तापमान नियंत्रणाच्या प्रयत्नांचे परिणामही जाणून घेतले पाहिजेत. वातावरणाचं तापमान वाढण्यास औद्योगिकीकरण आणि शहरीकरण कारणीभूत आहे. त्यामुळे हरितगृह वायूंच्या संतुलनावर परिणाम झाला आहे. अलीकडच्या काळात ज्या स्वरूपाचे उद्रेक अचानक समोर आले, त्याची कारणं शोधावी लागतील. असं का होत आहे, यामागे कोणते वैज्ञानिक प्रयोग किंवा नैसर्गिक कारणं आहेत, हे जाणून घेतलं पाहिजे. यावर विश्वास ठेवायला आधार नसला तरी ‘क्लाऊड सीडिंग’च्या माध्यमातून होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांच्या तो दुष्परिणाम आहे. याबाबतचं सत्य उशिरा का होईना बाहेर येईल; पण हवामानावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये ज्या पद्धतीने असामान्य बदल किंवा परिणाम आजूबाजूला दिसत आहेत, त्याला प्रतिसाद देणं आवश्यक आहे.
लिव्हर आयोडाइड आणि इतर रसायनांच्या फवारणीमुळे आणि प्रयोगांमुळे काही रासायनिक प्रतिक्रिया घडली का, जी वातावरणात एक कप्पा बनली आणि आकाशात अदृश्य वायूंच्या रूपात जमा होत राहिली, याची आपल्याला माहितीदेखील नाही. ही अदृश्य ‘गॅस पॉकेट्स’ मोसमी वाऱ्यांच्या दिशेने पुढे सरकली आणि नैसर्गिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपला प्रभाव गमावत राहिली. त्यामुळे रासायनिक अभिक्रियांमुळे निर्माण झालेली घनता आणि जटिलता सैल होऊ लागली. हवामान नियंत्रणाबाबतही वेगळ्या प्रकारची चिंता आहे. सत्तेसाठी भविष्यात युद्धाचा धोका म्हणून त्याचा दुरुपयोग होऊ शकतो का? ज्या देशात किंवा शक्तीला शत्रू देश अस्थिर करू पाहत आहे, तिथे अशा नियंत्रणाने यादृच्छिक विनाश करूनही एक प्रकारचा विजय मिळू शकतो. असं घडलं आणि काही वेळा चिंता व्यक्त होऊ लागल्या, तर तो वेगळ्या प्रकारच्या युद्धाचा भयंकर काळ असेल. याचा परिणाम केवळ बाधित भागातल्या सामान्य जीवनावरच होणार नाही, तर निसर्गाबाबत खूप क्रूरता येईल. त्याची भरपाई करणं जवळजवळ अशक्य होईल. अर्थात, जलद हवामान बदलामुळे हरितगृह वायूंचं अत्याधिक उत्सर्जन होत आहे, ज्याचा थेट परिणाम जागतिक तापमानावर होतो. दुसरीकडे, ‘क्लाऊड सीडिंग’ किंवा हिवाळा, उष्णता, पाऊस, बर्फ अशा अनैसर्गिक मार्गांनी आणि इच्छित क्रियाकलापांवर नियंत्रण निर्माण झाल्यामुळे हवामान चक्र भटकू लागतं, खंडित होतं आणि प्रभाव पडतो. हा देखील अनैसर्गिक प्रयोगांचा दुष्परिणाम आहे.
प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचं बेहिशेबी शोषण यामुळे निसर्गाचा समतोल आधीच बिघडला आहे. हवामान नियंत्रणासाठी रासायनिक प्रयोगांनी आगीत इंधन टाकलं आहे. असे प्रयोग करणाऱ्यांमुळे एके दिवशी निसर्गाचं हवामानावरील नियंत्रण सुटेल. सर्वाधिक ताकदवान बनण्याचं आणि जगाला आपल्या बोटावर नाचवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांच्या हातातलं आपण बाहुलं बनू. रसायनं वापरून फवारलेल्या आयनीकरण धातूच्या क्षारांमुळे ढगांना विचित्र स्वरूप प्राप्त होतं. शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या वातावरणातल्या महत्त्वपूर्ण भागाचं प्लाझ्मामध्ये हळूहळू होणारं परिवर्तन नोंदवलं आहे. या प्लाझ्मामध्ये बेरियम क्षारांचे कण असतात. ते मानवनिर्मित आपत्ती आणि हवामान बदलासाठी ‘हार्प’ तंत्रज्ञानामध्ये वापरले जातात. अशा तंत्रज्ञानामुळे भूकंप आणि हवामानातले बदल आकार घेऊ शकतात, हे अभ्यासातून सिद्ध झालं आहे. गेल्या ४३ वर्षांमध्ये पृथ्वीच्या वातावरणाचा काही भाग विक्रमी मूल्यांनी कमी झाला. ‘हार्प’ कार्यक्रम केवळ एक संशोधन कार्यक्रम म्हणून जागतिक समुदायासमोर सादर केला जातो, ज्याचा उद्देश रेडिओ संप्रेषण सुधारण्याचे मार्ग शोधणं हा आहे. मात्र यामुळे पृथ्वीचं वातावरण, आयनोस्फियर आणि मॅग्नेटोस्फियर बदललं जाऊ शकतं. यासंदर्भात विविध शक्तींचे पाच उत्सर्जक तयार केले गेले आहेत आणि ते उच्च-फ्रिक्वेंसी रेडिओ लहरींसह मानवी वातावरणावर हेतूपुरस्सर प्रभाव टाकण्यासाठी कार्यरत आहेत. त्यापैकी तीन ट्रॉम्सो इथल्या स्कॅन्डिनेव्हियन द्वीपकल्पात आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या जवळच्या वातावरणाचा समतोल बिघडतो. ‘हार्प’ उत्सर्जक पूर्ण शक्तीने चालू केल्यास पृथ्वीच्या जवळच्या वातावरणाचं काय होईल, हे आधुनिक भौतिकशास्त्र सांगू शकत नाही.
-भास्कर खंडागळे