Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेसेनेच्या स्वप्नांना कळवा-खारेगावात सुरुंग

सेनेच्या स्वप्नांना कळवा-खारेगावात सुरुंग

महाविकास आघाडीत अडचणी वाढणार...

अतुल जाधव

ठाणे : महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रभागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. शहरातील सर्वाधिक लक्ष असलेल्या आणि सध्या राज्यातील सत्तेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या कळवा-मुंब्र्यात काय होणार? याची उत्सुकता सर्वांना होती; परंतु अंतिम प्रभाग रचना अखेर राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. अंतिम प्रभाग रचनेत सत्ताधारी शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या प्रभागांची तोडफोड झाली असल्याने शिवसेनेतर्फे इच्छुक असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे.

महापालिका निवडणुकांची अंतिम प्रभाग रचना अपेक्षेप्रमाणे वादग्रस्त ठरली आहे. कच्ची प्रारूप रचना जाहीर करण्यात आल्यावर ठाण्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय वादंग निर्माण झाले. या प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप झाला असल्याची चर्चा देखील रंगली. मात्र अंतिम आराखडा जाहीर झाल्यानंतर कळवा-खारेगावात राष्ट्रवादीने निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवला असल्याचे चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अंतिम प्रभाग रचनेत शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्ये बदल करण्यात आले असल्याने निश्चितच या भागात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. कळव्यात सध्या शिवसेना पक्षाचे ८, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ९ नगरसेवक असून या प्रभाग रचनेमुळे शिवसेनेला फटका बसणार असून राष्ट्रवादीच्या नागरसेवकांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये खाडीच्या अलीकडे आणि खाडीच्या पलीकडील वातावरण चांगलेच तापले आहे.

सध्याचा प्रभाग क्रमांक ३४ मध्ये मनीषा नगर, महात्मा फुले नगरमध्ये राष्टवादीची ताकद असल्याने शिवसेनेची एक जागा कमी होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे प्रभाग क्रमांक ३२ मध्ये सध्या शिवसेनेचा १, तर राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आहे. प्रभाग क्रमांक ३१ मध्ये शिवसेनेचे तीन, तर राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आहे. प्रभाग क्रमांक ३३ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या माजी विरोधी पक्षनेत्या प्रमीला केणी, अपर्णा साळवी, वर्षा मोरे आणि मनोहर साळवी या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद कायम राहणार आहे.

कळव्यात सध्या शिवसेनेचे ८ नगरसेवक असून अंतिम प्रभाग रचनेत ही संख्या ६ वर येण्याची चिन्हे आहेत, तर राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक असून ही संख्या १२ वर येण्याची शक्यता आहे. शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -