Thursday, May 28, 2026

पावसाळी मासेमारी बंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

पावसाळी मासेमारी बंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

१ जून ते ३१ जुलै दरम्यान यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना बंदी

मुंबई : मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व वित्त रक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार १ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार, नौका मालक, तांडेल आणि खलाशी यांनी शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळी हंगामात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मासेमारी करताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या काळात विविध माशांच्या प्रजातींचा प्रजनन कालावधी असल्याने मासेमारी बंदीमुळे मत्स्यसंपत्तीचे संवर्धन होण्यास मदत होते. या निर्णयामुळे भविष्यात मच्छीमारांना अधिक प्रमाणात मासळी उपलब्ध होऊन आर्थिक लाभ होणार असल्याचे मत मत्स्यव्यवसाय विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे.सर्व संबंधितांनी शासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई शहरचे मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त यांनी केले आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >