कटनी : बिहारमधून महाराष्ट्रात नेण्यात येत असलेल्या १६३ मुलांना मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे थांबवून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही सर्व मुले गरीब मुस्लिम कुटुंबातील आहेत. या मुलांना घेऊन जाणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. बऱ्याच काळापासून बिहारमधील अशा मुलांना महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातच्या मदरसांमध्ये नेऊन त्यांना धार्मिक कट्टरतेचे शिक्षण दिले जात असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. या प्रकरणात आता भारतीय गुप्तचर संघटना (आयबी) तपास करीत आहे. सोमवारी आयबीच्या एका पथकाने अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली.
पोलिस संरक्षणात घेतलेली ही मुले बिहारच्या अररिया जिल्ह्यातील आहेत. कटनी जीआरपीने या मुलांच्या पालकांना चौकशीसाठी बिहारहून बोलावले होते. सध्या मुलांचे समुपदेशन केले जात आहे. दरम्यान, बिहारमधून चार मुलांचे पालक कटनीला पोहोचले आहेत. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात पालकांनी आपल्या मुलांना धार्मिक शिक्षणासाठी मदरशात पाठवल्याचे म्हटले आहे. तर बिहारमध्ये मोठे मदरसे असताना मुलांना दुसऱ्या राज्यात का पाठवले जात होते, या बाजुनेही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांच्या या प्रश्नाचे उत्तर ना आरोपी व पालकांना देता आले नाही.
पाटणा-पुणे एक्सप्रेसने अररिया येथील मुलांना महाराष्ट्रातील लातूर आणि कर्नाटकात येथे नेले जात होते. रेल्वेतील सद्दाम नावाच्या व्यक्तीसोबत १०० मुले होती. जीआरपीने बाल कल्याण समितीच्या तक्रारीवरून सद्दामसह त्याचे साथीदार अमान उल्ला, मो. जाहिर, आमिर खान, हाफिज अबू तालिम, मो. इस्लाम, नौसाद आणि राशिद यांच्यावर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. जीआरपीने सांगितले की आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत; मात्र, हे आरोपी कोणत्या धार्मिक संस्थेशी संबंधित आहेत, हा तपासाचा विषय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा-पुणे एक्सप्रेसमधून उतरवण्यात आलेल्या मुलांचे वय ७ ते १५ वर्षांच्या दरम्यान आहे. या मुलांना सध्या कटनी आणि जबलपूर येथील बाल संरक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.






