Monday, March 30, 2026

रामदास आठवलेंनी रिपाईंच्या कार्यकर्त्यांना सुनावले खडे बोल

रामदास आठवलेंनी रिपाईंच्या कार्यकर्त्यांना सुनावले खडे बोल
मुंबई : रिपब्लिकन पक्षाची देशभर घोडदौड सुरु आहे. नागालँन्ड सारख्या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार निवडुन आले आहे. मणिपुरमध्ये पक्षाला 17 टक्के मतदान मिळुन पक्ष मान्यता प्राप्त झाला आहे. मुंबईत मात्र रिपाइंच्या उमेदवारांना मतदान मिळत नाही. अनेक वॉर्डात आपला पाठिंबा नसला तरी मित्र पक्षाचे उमेदवार निवडुन येतात. एकेकाळी मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक  निवडुन आले होते मुंबईचे महापौर पद ही रिपब्लिकन पक्षाला मिळाले होते. आता मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्ष कुठे आणून ठेवलाय याचे आत्मपरिक्षण करावे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुंबईतील  पदाधिकारी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चार पावले मागे येवुन तरुण पिढीला संधी दिली पाहिजे. दलित पँथरसारखी तरुणांची फौज उभी केली पाहिजे. युती झाली नाही तरी स्वबळावर उमेदवार निवडुन आणता आले पाहिजे. केवळ बौध्दांच्या मतांवर उमेदवार निवडुन येणार नाहीत. सर्व समजाला सोबत घेवुन मुंबईत रिपब्लिकन पक्षाची मजबुत पुर्नबांधणी करा. असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले.
चेंबुर येथील फाईन आर्ट सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हयाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या पुढाकारातुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी पुज्य बौध्द धम्म गुरु डॉ. राहुलबोधी महाथेरो यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमीत्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मी राज्यात कॅबिनेट मंत्री होतो, त्यानंतर मी तीनवेळा लोकसभेत निवडुन आलो. आता राज्यसभेत तीनवेळा निवडुन आलो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मी तीनवेळा राज्यमंत्री झालो आहे. मी कुणाला मागायला गेलो नाही, राजकारणात मागुन मिळत नाही. माझ्या पाठिशी गोरगरीब जनता, झोपडीवासी, दलित, बहुजन , आदिवासी सर्व महाराष्ट्राने मला ताकद दिली म्हणुन मी दिल्लीचे तख्त गाठु शकलो. राज्यात एकही असे गांव नसेल जिथे माझा संपर्क झालेला नाही. संपूर्ण देशात मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष पोहचवला आहे. मला एकटयाला सत्ता नको, माझ्या सहका-यानाही सत्तेत सहभाग दिला पाहिजे मात्र माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नाही. आपण तळागाळातील जनतेशी संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. सतत लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळत राहिला पाहिजे. तसे होत नाही त्यामुळे कदाचित राज्यात माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नसेल. मुंबईत आणि राज्यात पक्षाची प्रचंड ताकद आहे. ती जागृत केली पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.  मी कधीच मित्रपक्षाच्या चिन्हांवर निवडणुक लढलो नाही. आपल्या पक्षांवर आपण प्रेम केले पाहिजे. गन्ना किसान हे आपल्या पक्षाला निवडणुक चिन्ह मिळाले आहे. आपल्या पक्षाच्या चिन्हांवर निवडणुक जिंकता आली पाहिजे. त्यासाठी नियोजन करुन पक्षबांधणी करा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.
माझ्या भिमामुळे माझ्या कामाला येत आहे आकार,
म्हणून चेंबुरमध्ये होत आहे माझा सत्कार
माझ्या आयुष्यात मी  कधी मानली नाही हार
कारण मी दुश्मनांवर करीत आलो वार
सर्वांसाठी माझे उघडे असते दार
कारण देशभरात जागी केली दलित नार
अशी कविता ना. रामदास आठवले यांनी सादर केली. यावेळी या सत्कार सोहळयाचे संयोजक जिल्हाध्यक्ष संजय डोळसे, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, सुरेश बारसिंग,  फुलाबाई सोनवणे,  अॅड. आशाताई लांडगे, शिलाताई अनिल गांगुर्डे, उषाताई रामलू, अभयाताई सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धिरज उबाळे, शिवसेना नगरसेविका समृध्दी काते, भाजप नगरसेविका आशा मराठे, रिपाइंचे मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, रिपाइंचे मुंबई सरचिटणीस विवेक पवार, अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष सोहेल शेख,   अजित रणदिवे, रमेश गायकवाड, बाळासाहेब बनसोडे, रवि गायकवाड, सुभाष साळवे, अनिस पठाण आदि अनेक मान्यंवर यावेळी उपस्थित होते.  यावेळी फाईन आर्ट  सभागृह गर्दीने फुलुन गेले होते.
Comments
Add Comment