नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये वाढत्या संघर्षामुळे दिल्ली विमानतळावरील अनेक उड्डाणांवर परिणाम झाला आहे. काही फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या असून अनेक उड्डाणे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमानतळावर प्रवासी चिंताग्रस्त आणि त्रस्त अवस्थेत दिसून आले.
यासंदर्भात एका प्रवाशाने सांगितले की, मध्यपूर्वेतील परिस्थिती गंभीर झाल्यामुळे मक्का-मदीना येथे जाण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. संघर्षामुळे अनेक देशांच्या विमानसेवा प्रभावित झाल्या आहेत. मात्र, एका सौदी एअरलाइनची सेवा वेळेवर सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतासह इतर देशांच्या विमानकंपन्यांच्या उड्डाणांमध्ये विलंब आणि रद्द होण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांना गैरसोय होत आहे. दरम्यान, एक कुटुंब उमरासाठी दिल्लीहून सौदी अरेबियाला रवाना होणार होते. या कुटुंबातील एका प्रवाशाने सांगितले की, आम्ही उमरा करण्यासाठी मक्का येथे जात आहोत. सध्याची परिस्थिती कठीण आहे, परंतु आमची वेळ आल्याने आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही अर्ज खूप आधी केला होता, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे सामान्य होती.
यासोबतच एका महिला प्रवाशाने सांगितले की भारत आणि सौदी एअरलाइनच्या उड्डाणे सुरळीत सुरू आहेत आणि कोणतीही अडचण आलेली नाही. हज यात्रेकरूंची विशेष काळजी घेतल्याबद्दल त्यांनी सौदी एअरलाइनचे कौतुक केले. उपलब्ध माहितीनुसार, सौदी एअरलाइनने आपली कोणतीही फ्लाइट रद्द केलेली नाही. दुसऱ्या एका प्रवाशाने भीती व्यक्त करताना सांगितले की, थोडी भीती वाटते, पण ईश्वरावर विश्वास आहे. तो आपले रक्षण करेल. आपण विश्वास ठेवला पाहिजे. तो आपल्याला कधीही एकटे सोडणार नाही असे त्यांनी सांगितले. दरम्यान पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय हवाई सेवांवर होत असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित विमानकंपन्यांकडून अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.







