Wednesday, February 25, 2026

राज्यसभेसाठी शरद पवारांची मनधरणी सुरू

राज्यसभेसाठी शरद पवारांची मनधरणी सुरू

- उबाठा आणि काँग्रेसची कोंडी; जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळेंचा पुढाकार

मुंबई : शरद पवार गटाला बाजूला ठेवून उबाठा आणि काँग्रेस राज्यसभा निवडणुकीसाठी वाटाघाटी करीत असताना, पवारांच्या शिलेदारांनी त्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. संख्याबळ नसतानाही राज्यसभेची एक जागा पदरात पाडून घेण्याची आयती संधी हातून जाऊ नये, यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढण्यास अनुकूल नसतानाही शरद पवार यांनीच रिंगणात उतरावे, यासाठी त्यांची मनधरणी सुरू करण्यात आली आहे. जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

महाविकास आघाडीच्या (मविआ) गणितानुसार राज्यसभेची एक जागा जिंकणे शक्य आहे. मविआकडे एकूण ४६ मते (उबाठा २०, काँग्रेस १६ आणि पवार गट १०) असल्याने ही जागा सहज मिळू शकते. सुरुवातीला या जागेसाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्य आणि वयोमान लक्षात घेता त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने समीकरणे बदलली. पवार गटाला बाजूला ठेवून उबाठा गट आणि काँग्रेसने वाटाघाटी सुरू केल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याचा फैसला निकट असताना अशा महत्त्वाच्या टप्प्यावर पवारांनी सक्रिय राजकारणातून दूर राहणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “शरद पवार यांनीच राज्यसभा लढवावी, ही आमची भूमिका आहे. मी आणि जयंत पाटील काँग्रेसशी चर्चा करणार असून उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहोत.”

शरद पवार आज मुंबईत दाखल होणार असून पुढील तपासण्यांसाठी ते ब्रिच कॅन्डी रुग्णालयात जाणार आहेत. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे. दुपारी जयंत पाटील त्यांची भेट घेणार असून त्यानंतर ठाकरे यांची भेट घेऊन पवारांच्या उमेदवारीबाबत भूमिका मांडली जाणार असल्याचे समजते.

सुप्रिया सुळेंची संपर्क मोहीम :

सुप्रिया सुळे यांनीही राज्यसभेसाठी शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. “रुबी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला असून ते मुंबईला येत आहेत. सर्वांचा आग्रह आहे की त्यांनीच राज्यसभेवर जावे. जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली आहे. मी संजय राऊत आणि यांच्याशी संपर्क साधला आहे. दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांनाही भेटणार आहे,” असे सुळे यांनी सांगितले. एकमताने निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आज मविआची बैठक :

आज विधानभवनात महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होणार असून राज्यसभा निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. उबाठा गटाकडून आदित्य ठाकरे हे एक जागा आपल्या पक्षाला मिळावी, यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. मात्र, मविआकडून शरद पवार यांच्या नावाचीच जोरदार चर्चा सुरू असल्याने अंतिम निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >