Wednesday, February 25, 2026

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती +५,३५०) पहिल्या, दक्षिण आफ्रिका (धावगती +३,८००) दुसऱ्या, भारत (धावगती -३,८००) तिसऱ्या आणि झिम्बाब्वे (धावगती -५.३५०) चौथ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजने झिम्बाब्वे विरुद्धचा सामना १०७ धावांनी तर दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धचा सामना ७६ धावांनी जिंकला आहे. आता गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आणि भारताने त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजताच्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव केला तर भारताच्या सेमी फायनल खेळण्याच्या आशा जिवंत राहतील. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध जिंकल्यानंतर रविवार १ मार्च रोजी वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच पण जिंकावी लागेल. वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव तसेच भारताचा झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या दोन संघांविरुद्ध विजय झाला तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये खेळू शकेल. यातील एखादा निकाल वेगळा लागला तरी भारताचे सेमी फायनल खेळण्याचे स्वप्न धूसर होण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर भारतीय संघाची हीदेखील इच्छा असेल की, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुपर ८ मधील आपले सर्व सामने जिंकावेत, अन्यथा गणित बिघडू शकते. भारताने याआधी २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकला होता.

Comments
Add Comment