मुंबई: गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवाळ यांचं नाव सातत्याने चर्चेत आहे. अशातच आता त्यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट शब्दांमध्ये नरहरी झिरवाळ यांना सुनावलं आहे. यावरून त्या त्यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाच घेताना रंगे हाथ पकडण्यात आले. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्वरत करून देण्यासाठी त्याने ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
या सर्व प्रकारानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या झिरवाळ यांच्या कारभारावर प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाचलुचपत प्रकरणामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. साहजिक या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड बदनामी झाली होती. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांच्यासमोर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या :
स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या. तसेच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाही, याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवाळ यांना केल्याचे सांगितले जाते. अन्न आणि औषध खात्याच्या कर्मचाऱ्याला एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर वेगाने कारवाई सुरु झाली होती. त्यानंतर नरहरी झिरवळ अज्ञातवासात गेले होते. त्यांचा फोन स्वीच ऑफ असल्याने ते जवळपास नॉट रिचेबल होते. मात्र, याप्रकरणाची प्रचंड चर्च व्हायला लागल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुकाणू समितीची तातडीची बैठक बोलावली होती. त्यानुसार काल देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडली.







