Saturday, November 22, 2025

पवई तलावाचा जलपर्णीचा विळखा सुटणार!

पवई तलावाचा जलपर्णीचा विळखा सुटणार!

मुंबई : पवई तलावात होणारे सांडपाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी आता पवई येथील सध्या बंद असलेल्या पंपिंग स्टेशनच्या जागेवर मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. आठ दशलक्ष लिटर क्षमतेचे हे मलजल पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असून हे काम पूर्ण झाल्यावर पवई तलावातील जाणारे जल प्रदूषण थांबवता येणार आहे. तर मलजल प्रक्रिया केंद्र उभारून प्रक्रिया केलेले पाणी पवई तलावात सोडल्याने पाण्याचे संतुलन राखता येईल आणि तलावातील जलचर तथा जैव विविधता जपता येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या कामासाठी ईस्ट इंडिया उद्योग लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मुंबईतील नद्या तथा तलाव किंवा खाडी यामध्ये बिनपावसाळी अंतर्गत प्रवाह, सांडपाणी तसेच विनाप्रक्रिया मलप्रवाह तथा अर्धवट प्रक्रिया केलेले पाणी सोडले जात असल्याने जल प्रदूषण होते. त्यामुळे यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पवई तलावात येणाऱ्या बिना पावसाळी प्रवाह अर्थात सांडपाण्याचा शोध घेणे, त्याला अटकाव करणे तसेच दुसरीकडे वळवणे आणि सांडपाण्याचा अटकाव करण्यासाठी प्रयोगिक तत्त्वावर अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात पहिल्या टप्प्यात बिना पावसाळी प्रवाहाचा अर्थात सांडपाणी रोखण्यासाठी खुल्या चर आणि एचडीडी पद्धतीने विविध व्यासाची मलवाहिनी टाकणे आदी कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

पुढील दहा वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी तर आता दुसऱ्या टप्प्यात पवई येथील वापरात नसलेल्या उदंचन केंद्राच्या अर्थात पंपिंग स्टेशनच्या जागेवर आधुनिक आणि पूर्णपणे स्वयंचलित असे ८ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. याचे बांधकाम करून पुढील ६ वर्षांच्या कालावधीसाठी देखभाल करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. या केंद्र उभारणीसह देखभालीच्या कामांसाठी सुमारे ६६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी ईस्ट इंडिया उद्योग लिमिटेड आणि एसएसजी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही पात्र ठरली आहे. या कंपनीने बांमरोळी येथे अस्तित्वात असलेल्या १०० दशलक्ष क्षमतेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्राचा विस्तार करून ते २१५ दशलक्ष क्षमतेपर्यंत वाढवण्याचे काम केले आहे. तसेच त्याची पुढील दहा वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी आहे.

Comments
Add Comment