Wednesday, November 19, 2025

चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

रत्नागिरी : चिपळूणच्या वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका अल्पवयीन तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे (१५) असे या दुर्घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे.

आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा घारे आणि त्याचे अन्य चार मित्र पोहण्यासाठी वाशिष्ठी नदीपात्रामध्ये गेले होते. उकाड्यामुळे हैराण झालेल्या या मुलांनी वाशिष्ठीत पोहण्याचा बेत केला होता. त्यानुसार सायंकाळी ते वाशिष्ठी नदीपात्रात उतरले. मात्र यावेळी वाशिष्ठी नदीच्या उधाणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तलहा अल्पवयीन तरुण नदीपात्रात बुडू लागला. आपला मित्र बुडताना पाहून त्याच्यासोबत असलेले इतर मित्र त्यावेळी घाबरून गेले. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी कोणीही जाऊ शकले नाही. यावेळी या मुलांनी आरडाओरड केली व मदत मागितली.

यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी नदीकिनारी धाव घेत किनार्‍यावर असलेल्या बोटी सोडून बुडालेल्या तलहाचा शोध घेण्यास सुरुवात केली. याची माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना देण्यात आली. तत्काळ घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले. स्थानिक बोटचालकांच्या मदतीने वाशिष्ठी नदीपात्रात मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्ध्या तासानंतर त्याचा मृतदेह वाशिष्ठी नदीपात्रात आढळून आला. यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >