सिन्नर (वार्ताहर) : सिन्नर-ठाणगाव रोडवर आटकवडे शिवारात चालत्या रिक्षातून घाबरून उडी मारल्याने एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला असून एक चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. १) सकाळच्या सुमारास घडली.
डूबेरे येथील जनता विद्यालयात नुकतीच १०वीत गेलेली गायत्री अशोक चकणे (१४) रा. वडगाव पिंगळा, हल्ली मुक्काम आटकवडे व ५वीतील सायली भगवान आव्हाड (११) रा. आटकवडे या सकाळी महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन करण्यासाठी व आपली गुणपत्रिका घेण्यासाठी शाळेत गेल्या होत्या. गुणपत्रिका घेऊन घरी येण्यासाठी त्यांनी डूबेरे येथून सिन्नरकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या समीर अहमद शेख यांच्या अॅपे रिक्षाला हात देऊन पाठीमागे बसल्या.
आटकवडे शिवारात रिक्षाचालक सदर मुलींना उतरून देण्याचे लक्षात न राहिल्याने तो सरळ चालू लागला. पाठीमागे बसलेल्या मुलींनी त्याला जोरजोरात हाक मारून रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षाचालकाला मुलींचा आवाज ऐकू आला नाही. मुलींचा आरडाओरडा एकूण रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनीही त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो जोरात पुढे चालू लागला.
रिक्षा न थांबल्याने दोन्ही मुली घाबरल्या. यावेळी गायत्रीने चालत्या रिक्षातून रस्त्यावर उडी घेतली. तीला बघून सायलीनेही उडी घेतली. मात्र, रिक्षा जोरात असल्याने गायत्रीने उडी घेताच तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर सायलीला मार लागून ती गंभीर जखमी झाली. पोलिसांनी पंचनामा केला असून रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.