बंगळुरू : तब्बल अठरा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल जिंकली. या निमित्ताने बंगळुरूत आयोजित विजयी मिरवणूक चेंगराचेंगरी झाल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. बंगळुरूत चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट नंबर ३ जवळ झालेल्या चेंगराचेंगरीत दहा पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. चेंगराचेंगरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हट्टामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या राजकीय विरोधकांकडून होत आहे.
https://prahaar.in/2025/06/04/11-killed-25-injured-in-fan-stampede-outside-chinnaswamy-stadium-for-rcb-victory-parade/
आधी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये क्रिकेटपटूंचा सत्कार करायचा असे नियोजन करण्यात आले होते. पण राजकीय लाभासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी क्रिकेटपटूंचा पहिला सत्कार बंगळुरूत विधानसौद अर्थात विधान भवनाच्या आवारात करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार क्रिकेटपटूंचा विधानसौद अर्थात विधान भवनाच्या आवारात सत्कार झाला. यानंतर क्रिकेटपटू चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले. अनेक क्रिकेटप्रेमी विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांना बघण्यास उत्सुक होते. विधानसौद अर्थात विधान भवनाच्या आवारातून क्रिकेटपटू चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने निघाल्याचे समजताच अनेकांनी रस्त्यावर जमेल तिथे जागा पटकावून क्रिकेटपटूंची एक झलक बघण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने धाव घेतली. स्टेडियममध्ये प्रवेश करतेवेळी क्रिकेटपटूंना बघण्यासाठी मोक्याच्या जागेवर उभे राहण्याकरिता नागरिक धावपळ करू लागले. यातून धक्काबुक्की सुरू झाली. गर्दीला आवरणे कठीण आहे याचा अंदाज येताच पोलिसांनी आधी सौम्य लाठीमार केला. पण परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीमार करावा लागला. यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि दहापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला, अनेकजण जखमी झाले.