ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी आपला दरारा कायम राखत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. भारतीय लष्कराची पहिली महिला बॉक्सर आणि जागतिक विजेती जास्मिन लंबोरिया हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. भिवानीच्या या २४ वर्षीय प्रतिभावान बॉक्सरने महिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नॉर्दर्न आयर्लंडच्या गतविजेत्या मायकेला वॉल्शचा पराभव करून हे यश संपादन केले. विशेष म्हणजे, चार वर्षांपूर्वी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या जास्मिनने यंदा आपल्या पदकाचा रंग बदलत थेट सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
https://prahaar.in/2026/08/02/priya-ghanghass-remarkable-feat-won-the-gold-medal-by-defeating-a-canadian-boxer/
गंभीर आजारपण आणि खडतर संघर्ष
जास्मिनचा हा विजय जितका सोपा वाटतो, तितकाच तो संघर्षाने भरलेला होता. ग्लासगोच्या रिंगणात उतरण्याच्या काही आठवड्यांपूर्वी तिला गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते, ज्यामुळे तिच्या स्पर्धेतील सहभागावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मार्च महिन्यात आशियाई चॅम्पियनशिपदरम्यान तिच्या अडचणी सुरू झाल्या. प्रचंड ताप आणि डोक्याला झालेली गंभीर दुखापत असतानाही तिने हार मानली नाही. सलग तीन खडतर लढती जिंकून तिने अंतिम फेरीत प्रवेश केला आणि रौप्य पदक पटकावत राष्ट्रकुल खेळांसाठी पात्रता मिळवली.
भारतात परतल्यानंतर तिचा त्रास आणखी वाढला. सुमारे २० दिवस सराव केल्यानंतर तिला पुन्हा तीव्र ताप आला आणि प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. या आजारपणामुळे ती जूनमध्ये चेक प्रजासत्ताकमधील भारताच्या एक्सपोजर कॅम्पमध्येही सहभागी होऊ शकली नाही, ज्यामुळे तिच्या राष्ट्रकुल तयारीला मोठा धक्का बसला. ५७ किलो वजनी गट आशियाई खेळांमध्ये समाविष्ट नसल्यामुळे, ही राष्ट्रकुल स्पर्धा तिच्यासाठी या वर्षातील सर्वात मोठे आव्हान ठरली.
https://prahaar.in/2026/08/02/glasgow-2026-commonwealth-games-sakshi-chaudharys-golden-feat-makes-history-by-defeating-english-boxer-5-0/
मानसिक कणखरपणा आणि पुनरागमन
इतका काळ खेळापासून दूर राहावे लागल्यामुळे तिच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागले होते. अशा बिकट परिस्थितीत तिने क्रीडा मानसशास्त्रज्ञाची मदत घेतली आणि प्रशिक्षकांनी तिला सतत प्रोत्साहन दिले. १ जुलैपासून तिने पुन्हा नियमित सरावाला सुरुवात केली, ज्यामुळे तिला राष्ट्रकुल तयारीसाठी एका महिन्यापेक्षाही कमी वेळ मिळाला.
पीटीआयशी बोलताना जास्मिनने सांगितले, “आजारपण, अपूर्ण तयारी आणि असंख्य आव्हानांनंतर ग्लासगोमध्ये तिरंगा फडकवणे हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे. मी फक्त माझ्या पदकाचा रंग बदलण्याच्या आणि देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याच्या उद्देशाने येथे आले होते.”
प्रशिक्षकांचा पाठिंबा आणि स्वतःच्या जिद्दीच्या बळावर जास्मिनने रुग्णालयाच्या बिछान्यापासून थेट ग्लासगोच्या विजयमंचापर्यंतचा प्रवास करत भारतीय क्रीडाविश्वात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या ऐतिहासिक सुवर्ण विजयाने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे.