– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष नियोजन प्राधिकरणास मान्यता
मुंबई : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मान्यता दिली. यामुळे मंदिर परिसरातील रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Eknath Shinde)
https://prahaar.in/2026/07/29/she-had-been-missing-for-24-hours-her-body-was-found-in-kala-talav-32-cctv-cameras-were-non-functional-what-exactly-happened-in-kalyan/
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मागणी केली होती त्याचबरोबर त्यांनी याबाबत पाठपुरावा देखील केला होता. त्यानुसार अक्कलकोट नगरपरिषद, सोलापूर जिल्हाधिकारी आणि म्हाडा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, अक्कलकोट मंदिर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण व विकास, वाहनतळ उभारणी, आरक्षित जागांचा विकास तसेच परिसराचे सुयोग्य नियोजन करण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. या विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी म्हाडाने सुमारे ५०० कोटींची तरतूद करण्याची तयारी दर्शविली आहे.
याशिवाय, पालखी मार्ग, समाधी मंदिर परिसर, शहरातील वाहतूक व्यवस्था, तलाव व बगीचे तसेच परिसरातील अन्य सार्वजनिक सुविधांचा विकासही या नियोजनामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा विकास अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने होणार असून भाविकांना आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. या निर्णयानंतर विशेष नियोजन प्राधिकरणाबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित क्षेत्रातील विद्यमान नियोजन प्राधिकरणाचे अधिकार संपुष्टात येऊन म्हाडाकडे नियोजन व विकासाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. (MHADA)