सांगली : श्रावण, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्या तोंडावर सर्वसामान्यांसाठी आणखी एक महागाईचा धक्का बसला आहे.राज्यात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून किरकोळ बाजारात एक किलो साखरेसाठी आता ४९ ते ५१ रुपये मोजावे लागत आहेत.गेल्या महिनाभरात घाऊक बाजारात प्रति क्विंटल ४०० ते ४५० रुपयांची वाढ झाली असून,किरकोळ दरही प्रतिकिलो ६ ते ७ रुपयांनी वाढले आहेत.
https://prahaar.in/2026/07/28/plastic-currency-notes-will-%e2%82%b910-and-%e2%82%b920-plastic-notes-be-introduced-now-major-announcement-by-the-central-government-rbi-gives-the-green-signal-for-trials/
दरवाढीमागे अनेक कारणे एकत्र आली आहेत.केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी देशांतर्गत साखर विक्रीचा कोटा कमी केल्याने बाजारातील पुरवठा घटला आहे.त्यातच २०२५-२६ च्या गळीत हंगामात साखर उत्पादनात मोठी घसरण झाली आहे.गेल्या वर्षी २७७ लाख टन उत्पादन झाले होते,ते यंदा केवळ १९९ लाख टनांवर आले आहे.कारखान्यांकडील शिल्लक साठा कमी झाल्यामुळे बाजारात साखरेची उपलब्धताही मर्यादित झाली आहे.
यंदाच्या जून-जुलै महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या पावसाचा फटका उसाच्या पिकालाही बसला आहे.त्यामुळे पुढील गळीत हंगामात साखर उत्पादनात आणखी २० ते २५ टक्क्यांची घट होण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे, सणासुदीच्या काळात मिठाई, फराळ आणि इतर खाद्यपदार्थांसाठी साखरेची मागणी वाढत असल्याने दरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
साखरेच्या वाढत्या किमतींमुळे आगामी सणासुदीच्या काळात घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता असून, पुढील काही महिन्यांत दर आणखी वाढतात का, याकडे ग्राहकांसह व्यापारी आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.