राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
मुंबई : भारतीय हवामान विभागाने देशातील हवामानाबाबत अत्यंत महत्त्वाचा आणि चिंता वाढवणारा इशारा जारी केला आहे. गंगेच्या मैदानी भागातील पश्चिम बंगालच्या उत्तर भागात ‘वरच्या हवेचे चक्रीवादळ सदृश चक्राकार वारे’ सक्रिय आहेत. दक्षिण-पूर्व राजस्थान आणि लगतच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. मान्सूनच्या तीव्र हालचालींमुळे पुढील २४ ते ४८ तासांत दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत ताशी ७० ते ८५ किमी वेगाने वादळी वारे वाहू शकतात. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि काही भागांत गारपिटीची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/07/24/judoka-tulika-maan-judoka-tulika-maan-provisionally-suspended-by-nada/
गुजरातमध्ये नवसारीत एअरलिफ्ट, वलसाडमध्ये १६ तासांत ४३ इंच पाऊस झाला. तर वलसाडच्या उमरगाम तालुक्यात अवघ्या १६ तासांत ४३ इंच पावसाची नोंद झाली आहे. नवसारीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करण्यात आले. अहमदाबाद, सुरतसह ५ शहरांच्या बाजारपेठा आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये १० नद्यांना पूर आला आहे. तर गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगा आणि यमुनासह १० नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सीतापूर जिल्ह्यामध्ये मुख्य रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने गावकऱ्यांना प्रवासासाठी बोटींचा वापर करावा लागत आहे. बिहारमध्ये पाटणा, भोजपूर, बक्सर, गोपालगंज, सारण, वैशाली आणि सिवानसह १९ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमध्ये बांसवाडा आणि डुंगरपूरसह ११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.
https://prahaar.in/2026/07/24/mumbai-railway-reservation-services-to-remain-suspended-for-three-and-a-half-hours/
भूस्खलनाचा धोका
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीर या डोंगराळ भागांत भूस्खलनाची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रवास टाळावा किंवा हवामान अंदाज पाहूनच बाहेर पडावे. वादळी वाऱ्यांमुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, तसेच शेतकऱ्यांनी उघड्यावर न राहता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. अशा सूचना केल्या आहेत. दिल्लीत ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहून पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे.