14 जिल्ह्यांकडे पावसाने फिरवली पाठ!
महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असला तरी राज्यात दोन वेगवेगळी चित्रे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला कोकण, मुंबई आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान विभागाने आजही काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Weather)
पालघर आणि डहाणू परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गुजरातकडे जाणारे काही महत्त्वाचे मार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील वाहतुकीवर परिणाम झाला असून काही रेल्वे सेवा तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत. तसेच रस्ते वाहतुकीलाही अडथळे निर्माण झाले आहेत. (Rain Alert)
https://prahaar.in/2026/07/24/palghar-rain-heavy-rainfall-warning-for-palghar-schools-and-colleges-in-palghar-dahanu-and-talasari-closed-today/
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही भागांमध्ये ताशी 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून त्यासोबत जोरदार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. कोकण, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड तसेच घाटमाथा आणि पुणे परिसरात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे या भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. (Monsoon Update)
दरम्यान, स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पावसाची तूट 24 टक्क्यांवरून 19 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. मात्र जुलैच्या अखेरीस मान्सूनचा वेग पुन्हा मंदावण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातजवळ तयार झालेली चक्रीय परिस्थिती आणि आसाममधील हवामान प्रणालीमुळे सध्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा प्रभाव वाढला आहे. (Maharashtra Rain)
दुसरीकडे मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज नाही. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशीम, बीड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये केवळ हलक्या सरी पडण्याची शक्यता असून मुसळधार पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कायम असून जुलैच्या अखेरीस पुन्हा पावसाची तूट जाणवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (IMD)
मुंबईत आजही मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. यासोबतच ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai Rain)
https://prahaar.in/2026/07/08/heavy-rain-in-palghar-ghonsai-village-surrounded-by-water-main-bridge-submerged/
आज सकाळी 9 वाजता 3.35 मीटर उंचीची भरती आली असून, सायंकाळी 7:53 वाजता 2.94 मीटर उंचीची आणखी एक भरती (High Tide) येणार आहे. दुपारी 3 वाजता ओहोटी (Low Tide) राहील, तर 25 जुलै रोजी पहाटे 2:26 वाजता पुन्हा ओहोटी होणार आहे. भरतीच्या काळात समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
गेल्या 24 तासांत मुंबईत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. शहर विभागात सरासरी 31.94 मिमी, पूर्व उपनगरात 33.97 मिमी, तर पश्चिम उपनगरात 32.16 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर दिवसभर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, वाहतूक स्थितीची माहिती घेऊनच प्रवास करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. (Monsoon Update)