अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने समुद्री प्रशासन महासंचालनालयाने (डीजीएमए) मोठा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांची नियुक्ती करू नये असे डीजीएमएने जहाज मालक, जहाज व्यवस्थापक आणि भरती करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत.
https://prahaar.in/2026/07/16/icc-warns-indian-fast-bowler-gurnoor-brar/
डीजीएमएने बुधवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, फारसच्या आखातातील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता भारतीय नाविकांच्या सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात या भागात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे संघर्षग्रस्त क्षेत्रात काम करणाऱ्या नाविकांसाठी धोका वाढला आहे.सरकारी आकडेवारीनुसार, भारत हा जगातील समुद्री कर्मचारी (सीफेअर्स) पुरवठा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जगभरातील जहाजांवर 3 लाखांहून अधिक भारतीय नाविक कार्यरत आहेत.या भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या विविध हल्ल्यांमध्ये 2 भारतीय नाविकांचा मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. डीजीएमएने आपल्या आदेशात कंपन्यांना सांगितले आहे की, पुढील सूचना मिळेपर्यंत होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांची नियुक्ती टाळावी.
https://prahaar.in/2026/07/16/japan-open-2026-badminton-sindhu-enters-quarter-finals/
डीजीएमएच्या सूचनेनुसार, जहाज मालकांनी फारसचा आखात, होर्मुज सामुद्रधुनी आणि आसपासच्या समुद्री भागातील सुरक्षा परिस्थितीबाबत सतर्क राहावे तसेच नौवहनासंबंधी इशाऱ्यांचे नियमितपणे निरीक्षण करावे. बदलत्या सुरक्षा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि भारतीय नाविकांची सुरक्षा व कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे डीजीएमएने स्पष्ट केले आहे.