मुंबई : मुंबईची पहिली वहिली आणि पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारी सर्वात महत्त्वाची ‘घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा’ (Ghatkopar Andheri Varsova metro) (मेट्रो-१) मार्गिका आता कात टाकणार आहे. सध्याच्या घडीला दररोज तब्बल ५ लाखांहून अधिक मुंबईकर या मार्गावरून ये-जा करतात. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा आणि प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता, मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) कडून या मार्गिकेचा मोठा विस्तार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी लवकरच नवीन डबे खरेदीची निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
४ डब्यांच्या मेट्रोचे होणार ६ डब्यांत रूपांतर
लोकल गाड्यांच्या फेऱ्या किंवा वातानुकूलित (AC) लोकलची संख्या वाढवूनही मुंबईतील चाकरमान्यांची गर्दी कमी होताना दिसत नाही. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी ऑफिसला जाताना-येताना मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडते. सध्याची ४ डब्यांची मेट्रो सेवा या वाढत्या गर्दीपुढे अपुरी पडत आहे. याच समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी MMOPL ने आता ४ ऐवजी ६ डब्यांच्या मेट्रो चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तब्बल ३२ अतिरिक्त नवीन डब्यांची खरेदी केली जाणार आहे.
https://prahaar.in/2026/07/15/nick-jonas-finally-reveals-the-first-dm-he-sent-priyanka-chopra-10-years-ago/
निधीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा
या भव्य विस्तारीकरणासाठी नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (NARCL) सोबत २,७७१.३२ कोटी रुपयांचा महत्त्वाचा करारही करण्यात आला आहे. सध्या काही आर्थिक अडचणींमुळे या डबे खरेदीच्या प्रस्तावाला थोडा विलंब होत आहे. मात्र, राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी आवश्यक निधी लवकरात लवकर मिळावा, यासाठी MMOPL कडून जोरदार पाठपुरावा आणि प्रयत्न सुरू आहेत.
मेट्रोच्या ताफ्यात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल :
- सध्या घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या मार्गावर एकूण १६ मेट्रो गाड्या प्रवाशांच्या सेवेत रुजू आहेत. या नव्या विस्तार योजनेनुसार, ही संख्या १६ वरून १७ वर नेण्यात येणार आहे.
- सध्या धावणाऱ्या ४ डब्यांच्या गाड्यांमध्ये प्रत्येकी २ अतिरिक्त डबे जोडून त्यांचे ६ डब्यांमध्ये रूपांतर केले जाईल.
- यासोबतच, प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ६ डब्यांची एक नवीन कोरी मेट्रो गाडी नव्याने खरेदी केली जाणार आहे.
- या महत्त्वपूर्ण बदलांमुळे मेट्रोच्या फेऱ्यांची प्रवासी क्षमता वाढेल आणि मुंबईकरांना रोजच्या धकाधकीच्या वेळेत अधिक प्रशस्त व गर्दीमुक्त प्रवासाचा आनंद घेता येईल.