मुंबई : भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील तिरंगी मालिकेतील सामन्यानंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुपर ओव्हरमध्ये भारताच्या पराभवानंतर मैदानावर घडलेल्या एका घटनेमुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सामन्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूसोबत झालेल्या शाब्दिक वादानंतर वैभवने प्रतिस्पर्धी खेळाडूला धक्का दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चा होत आहे.(Vaibhav Sooryvanshi)
नेमकं काय घडलं?
सुपर ओव्हरमध्ये भारत अ संघाला विजयासाठी 17 धावांची गरज होती. मात्र वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे यांना केवळ 9 धावा करता आल्या आणि भारताला निसटता पराभव स्वीकारावा लागला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू मैदानाबाहेर जात असताना काही शब्दांची देवाणघेवाण झाली.यावेळी वैभव अचानक श्रीलंकेच्या गोलंदाजाच्या दिशेने धावत गेल्याचे दिसले. परिस्थिती शांत करण्यासाठी मध्ये पडलेल्या विशेन नावाच्या खेळाडूलाही त्याने धक्का दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अखेर वरिष्ठ खेळाडू निरोशन डिकवेलाला हस्तक्षेप करून वाद शांत करावा लागला.
ICC आचारसंहितेनुसार कारवाई होणार?
या प्रकरणावर अद्याप आयसीसीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी हा प्रकार ICC Code of Conduct च्या कलम 2.12 अंतर्गत येऊ शकतो. या नियमांनुसार एखाद्या खेळाडूने प्रतिस्पर्धी खेळाडू,पंच, सामना अधिकारी किंवा इतर कोणाशीही अयोग्य शारीरिक संपर्क साधल्यास त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
https://prahaar.in/2026/06/16/minister-adv-shelar-memorandum-of-understanding-to-give-fresh-impetus-to-the-scientific-conservation-of-petroglyphs/
आंतरराष्ट्रीय पदार्पणावर परिणाम?
वैभव सूर्यवंशीला लवकरच भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या वादानंतर त्याच्यावर कोणती शिस्तभंगात्मक कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर गंभीर दोषी ठरला तर त्याच्या आगामी संधींवर परिणाम होऊ शकतो. सध्या मात्र अंतिम निर्णयाची प्रतीक्षा असून, क्रिकेट चाहत्यांसह भारतीय संघ व्यवस्थापनाची नजर मॅच रेफरींच्या अहवालावर खिळली आहे.