मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अधिकृत उमेदवार म्हणून आज माजी आमदार राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या दोन दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उमेदवारीवरून आणि कथित नाराजीवरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सकाळी ११.३० वाजता विधानभवनात अर्ज सादर करताना स्वतः मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. विधानभवनात भुजबळ यांचे आगमन होताच राजेंद्र जैन यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, यावा नेते पार्थ पवार यांच्यासह भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले प्रामुख्याने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी रविवारी रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या मॅरेथॉन बैठकीत या जागेसाठी अमरसिंह पंडित यांच्यासह अनेक नावांवर चर्चा झाली. मात्र, अखेर प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक असलेल्या राजेंद्र जैन यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले.
https://prahaar.in/2026/06/08/shocking-brother-in-law-hatched-plot-for-%e2%82%b930-lakh-insurance-payout-mystery-behind-sangli-murder-solved/
भुजबळांनी दिल्ली यायला हवे होते – सुप्रिया सुळे
दरम्यान, राज्यसभेच्या या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भुजबळांनी केलेले कष्ट आणि त्याग पाहता, त्यांना जर या टप्प्यावर दिल्लीला यायचे असेल तर त्यात गैर काय? आम्ही एकत्र असतानाही शरद पवार यांचा नेहमी आग्रह असायचा की भुजबळांचे नेतृत्व महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देशाला मिळाले पाहिजे. ते दिल्लीत आले असते तर त्यांची संसदेतील उत्कृष्ट भाषणे आणि विचार यांमुळे देशामध्ये एक मोठे नेतृत्व उभे राहिले असते. त्यांच्या भाषणातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले असते, एवढाच माझा स्वार्थ होता. पण शेवटी तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे.”
कोण आहेत राजेंद्र जैन?
राज्यसभेची लॉटरी लागलेले राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी म्हणून ओळखले जातात. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे त्यांचे स्वीय सहाय्यक (पीए) म्हणून जैन आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. पक्षात निष्ठेने काम करत असतानाच त्यांचा प्रभाव वाढत गेला. पक्षाने यापूर्वी त्यांची भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर (आमदार म्हणून) निवड केली होती. २०१६ च्या विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या परिणय फुके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. मात्र, पक्षातील दीर्घकालीन अनुभवामुळे आता त्यांना थेट संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे.