Home ब्रेकिंग न्यूज Chandrashekhar Bawankule : नवनीत राणांचा ‘बॉम्ब’ आणि बावनकुळेंची मिश्कील प्रतिक्रिया; म्हणाले, “नशिबात असेल तर…

Chandrashekhar Bawankule : नवनीत राणांचा ‘बॉम्ब’ आणि बावनकुळेंची मिश्कील प्रतिक्रिया; म्हणाले, “नशिबात असेल तर…

0
Chandrashekhar Bawankule : नवनीत राणांचा ‘बॉम्ब’ आणि बावनकुळेंची मिश्कील प्रतिक्रिया; म्हणाले, “नशिबात असेल तर…
Chandrashekhar Bawankule

अमरावती : अमरावतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नुकत्याच झालेल्या भाषणानंतर राज्याचे मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या ‘स्वदेशी’ आणि इंधन बचतीच्या आवाहनाचा अर्थ जनतेला समजावून सांगितला. याचबरोबर, माजी खासदार नवनीत राणा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडलेल्या राजकीय ‘बॉम्ब’वर मिश्कील टिप्पणी करत, “नशिबात असेल तर गाडी थांबत नाही,” असे सूचक विधान केले आहे.

इंधन बचत आणि स्वदेशीचा मंत्र

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा दाखला देत सांगितले की, सध्या आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर होत असून देशासमोरील आव्हाने वाढत आहेत. यावर उपाय म्हणून देशातील वाहनांमध्ये १०० टक्के इथेनॉलचा वापर सुरू झाल्यास भारताचा पैसा परदेशात जाणार नाही आणि देश खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ बनेल. पंतप्रधान मोदींनी तेलाचा वापर कमी करण्याचे जे आवाहन केले आहे, ते याच स्वदेशीच्या भावनेशी जोडलेले आहे. महात्मा गांधींनीही स्वदेशीला महत्त्व दिले होते आणि तोच विचार पंतप्रधान पुढे नेत असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

https://prahaar.in/2026/05/12/ed-summons-rupali-chakankar-in-ashok-kharat-case/

गरजेपुरताच वापर करा, काटकसर महत्त्वाची

पंतप्रधानांनी कोणतीही गोष्ट पूर्णपणे बंद करण्यास सांगितलेले नाही, असे स्पष्ट करत पालकमंत्र्यांनी दैनंदिन जीवनातील एक सोपे उदाहरण दिले. ते म्हणाले, “जसे घरात स्वयंपाक करताना चार-पाच भाज्या बनवल्या जातात आणि काही अन्न वाया जाते, तसे न करता गरजेनुसारच गोष्टींचा वापर व्हावा. जर घरात दोन वाहने असतील, तर गरजेनुसार एकाच वाहनाचा वापर करून इंधन वाचवावे.” प्रत्येक स्तरावर थोडी बचत आणि काटकसर केल्यास ते देशहिताचे ठरेल, असा संदेश पंतप्रधानांनी दिल्याचे बावनकुळे म्हणाले.

नवनीत राणांचा राजकीय ‘बॉम्ब’ आणि बावनकुळेंची फटकेबाजी

यावेळी राजकीय विषयांवरही चर्चा रंगली. नवनीत राणा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एका उमेदवाराला पाठिंबा दर्शवत राजकीय ‘बॉम्ब’ फोडला. यावर हसत हसत प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “नवनीत राणांनी बॉम्ब फोडला आणि तो पोटे यांच्या अंगावर गेला.” पुढे विधानसभेच्या तिकीट वाटपावर बोलताना ते म्हणाले, “पोटे साहेब आणि धांडे साहेब या दोघांचीही नावे चर्चेत आहेत. तिकीट कोणालाही मिळेल आणि कोणीतरी एक जण आमदार होईल. पोटे हे कर्तृत्ववान कार्यकर्ते असून त्यांच्यामागे मोठी ताकद आहे, तर नितीन धांडे यांचे कार्यही उत्तम आहे. नवनीत राणा यांच्या भावना आहेत की नितीन धांडे यांनी विधानसभेत जाऊन अमरावतीचे प्रश्न मांडावेत. मी त्यांनाही शुभेच्छा देतो.”

“नशिबात असेल तर…”

तिकीट मिळण्याच्या या राजकीय शर्यतीवर अत्यंत सूचक आणि मिश्कील भाष्य करताना बावनकुळे यांनी एका वाक्यात लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले, “नशिबात असेल तर गाडी उशिरा होऊ शकते, पण ती थांबू शकत नाही!” त्यांच्या या वक्तव्याने अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here