– झाडे कापणे, पुनर्रोपीत करणे, देखभाल करणे यावर करणार २ कोटींचा खर्च
मुंबई (सचिन धानजी)
विद्याविहार रेल्वे स्थानकावर एल.वी.एस. मार्ग व आर.सी. मार्ग यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या पोहोच रस्त्यांचे बांधकाम सुरु असून त्यात २१३ झाडे बाधित झाली आहेत. त्यातील ७७ झाडे कापली जाणार असून ७३ झाडे पुनर्रोपीत केली जाणार आहेत. उड्डाणपुलाच्या पोहच रस्त्यांच्या कामामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर नव्याने वृक्षलागवड आणि पुनर्लागवड करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या बदल्यात मुंबई महापालिका २,२७८ झाडे लावणार आहे. यासाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च केला जाणार असून यासाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/05/04/west-bengal-election-clashes-erupt-outside-bidhannagar-counting-centre-hours-before-results-tmc-bjp-supporters-face-off/
मात्र शहरात जागेअभावी वृक्षलागवड शक्य नसल्याने वन विकास महामंडळाकडे जागा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार पनवेल परिसरातील करंजाडे येथील २.०५ हेक्टर जागेवर वृक्षलागवड करण्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, रस्त्याच्या आराखड्यातील बदलामुळे आणखी २४ वृक्ष बाधित होणार असून त्यापैकी १२ वृक्ष कापणे आणि १२ पुनर्रोपण करण्याच्या बदल्यात अतिरिक्त २८८ नवीन वृक्ष लावण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे एकूण नवीन वृक्षांची संख्या २,२७८ इतकी झाली.
https://prahaar.in/2026/05/04/nitesh-rane-secularism-is-a-pest-created-by-congress-minister-nitesh-ranes-attack/
या पूल प्रकल्पाचे संपूर्ण कामकाज २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. येऊ घातलेल्या पावसाळ्याचा विचार करता, पुलाची सर्व आवश्यक कामे ३१ मे २०२६ पूर्वी पूर्णत्वास नेण्याचे नियोजन करावे. कामांचे सूक्ष्म नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्यामुळे हे काम प्रत्यक्षात नियोजित पेक्षा आधीच पूर्ण केले जाते का याकडे सर्वांचे लक्ष आहे.