मुंबई : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबतच्या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सध्या नाराजीनाट्य आणि अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित या कार्यक्रमात मंत्री झिरवळ यांनी स्वतः आदिवासी नृत्यावर ठेका धरत शरद पवारांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. या सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनीही नरहरी झिरवळ यांच्या कर्तृत्वाचे तोंडभरून कौतुक केले.
https://prahaar.in/2026/08/07/do-not-worry-i-am-with-you-prime-ministers-assurance-to-rebel-mps-from-trinamool-and-ubt-mps/
‘आदिवासी संस्कृती उत्सव वनरंग-२०२६’ या तीन दिवसीय महोत्सवात बोलताना शरद पवार यांनी झिरवळ यांच्या उपक्रमाचे आणि त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासाचे कौतुक केले. पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजधानीत आदिवासी संस्कृतीशी संबंधित एका मोठ्या उत्सवाचे आयोजन नरहरी झिरवळ यांनी केल्याचे मी ऐकत होतो. या महोत्सवाचे निमंत्रण जेव्हा माझ्याकडे आले, तेव्हा त्यातील तिन्ही दिवसांचे नियोजित कार्यक्रम मी सविस्तर वाचले. यात सांस्कृतिक कार्यक्रमांसमवेत दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांमध्ये निर्माण होणाऱ्या विविध कलाकृती आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व विक्री व्यवस्थाही करण्यात आली आहे. साहजिकच, झिरवळांनी आयोजित केलेल्या या अभिनव उपक्रमाविषयी माझ्या मनात मोठे औत्सुक्य होते. त्यामुळेच त्यांच्या सूचनेवरून मी आज येथे उपस्थित राहिलो. आज चव्हाण सेंटरमध्ये ज्या प्रकारे वर्षानुवर्षे जपली गेलेली आदिवासी संस्कृती, संगीत आणि अद्भुत कला पाहायला मिळाली, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.
https://prahaar.in/2026/08/07/meeting-between-pm-modi-and-sukhbir-singh-badal-sparks-intense-speculation/
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेव्हा विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा आम्ही सर्व नेत्यांनी मिळून उपाध्यक्षपदासाठी नरहरी झिरवळ यांचे नाव सुचवले होते. त्यावेळी काही ज्येष्ठ नेत्यांनी शंका उपस्थित करत, विधानसभेचे सभागृह चालवणे सोपे काम नाही, झिरवळांना हे कसे जमेल, असा प्रश्न केला होता. त्यावर मी सांगितले होते की, एकदा त्यांच्या हाती विधिमंडळाची सूत्रे देऊन तर पहा, मग सभागृह कसे चालते हे संपूर्ण महाराष्ट्र बघेल. पुढे विधानसभा अध्यक्षांचे पद रिक्त झाल्यानंतर अध्यक्षांची सर्व जबाबदारी झिरवळ यांनी अत्यंत समर्थपणे आणि सक्षमतेने सांभाळली. आदिवासी समाजातील नेतृत्वाला जर योग्य संधी मिळाली, तर ते इतिहास निर्माण करू शकतात, हेच झिरवळ यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात सिद्ध करून दाखवले, असे शरद पवार यांनी सांगितले.
https://prahaar.in/2026/08/08/headquarters-of-the-countrys-urban-cooperative-banks-to-be-in-mumbai-union-home-and-cooperation-minister-amit-shah-makes-the-announcement/
चांगल्या कामात झिरवळांच्या पाठिशी
सध्याच्या सरकारमध्ये ते अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहत आहेत, तर दुसरीकडे लोकसभेत खासदार भास्कर भगरे हेही आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करत उत्तम काम करत आहेत. याचा अर्थ एकच आहे की, या समाजाला योग्य संधी आणि ताकद दिली पाहिजे, मग त्यांच्या कर्तृत्वाचे दर्शन सर्वांना घडते. हाच संदेश या तीन दिवसांच्या वनरंग उत्सवातून संपूर्ण महाराष्ट्राला मिळत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. तसेच, अशा चांगल्या कामांमध्ये आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असेही शरद पवार यांनी सांगितले.