नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकत्र येणार का? याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यात झालेल्या बैठकीमुळे जुनी युती पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे. नवी दिल्लीतील संसद भवनात बादल यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीच्या अजेंड्यावर युतीबाबतची चर्चा होती.
https://prahaar.in/2026/08/07/the-storm-in-thalapathy-vijays-marriage-has-blown-over-wife-sangeetha-has-withdrawn-the-divorce-petition/
तीन वादग्रस्त कृषी कायद्यांवर झालेल्या वादानंतर, २०२० मध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यातील सुमारे अडीच दशके जुनी युती तुटली होती. त्यावेळी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा आपला निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांनी २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही, तर अकाली दलाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. युती तुटली असली तरी, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमधील वेळोवेळी होणाऱ्या भेटींमुळे युती पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरूच राहिली आहे. शुक्रवारी झालेली भेट भाजप आणि अकाली दल यांच्यातील भविष्यातील संबंधांचे कोणते राजकीय संकेत देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकाली दल, राज्याची भाजप युनिट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सर्व पक्ष युती पुन्हा सुरू करण्याच्या बाजूने आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले नेतेही युती पुनर्संचयित करण्याच्या बाजूने आहेत, आणि यावर अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल, असे सूत्रांनी सांगितले. तसे पाहता, या वर्षी मार्चमध्ये मोगा भेटीदरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी अकाली दलाशी युती करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. विश्लेषकांचे मते, भाजपची उपस्थिती राज्याच्या शहरी भागात असल्याने आणि अकाली दल ग्रामीण पंजाबमध्ये प्रभावशाली असल्याने, युतीमुळे दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो.
https://prahaar.in/2026/08/07/a-national-educational-center-combining-indian-knowledge-traditions-with-modern-technology-will-be-established-in-nashik-chief-minister-devendra-fadnavis/
समीकरणात बदल आणि अटी
पंजाबच्या अलीकडील दौऱ्यादरम्यान, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी सांगितले होते की, युतीबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. सूत्रांनी सांगितले की, भाजपला आता समान पातळीवर युतीचे नूतनीकरण हवे आहे. यापूर्वीच्या युतीत भाजप कनिष्ठ भागीदाराच्या भूमिकेत होता आणि अकाली दलाचे वर्चस्व नेहमीच राहिले होते. यापुढे युतीत भाजप ‘धाकटा भाऊ’ म्हणून राहणार नाही, असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनीही स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, अकाली नेत्यांच्या मते, जागावाटपासारख्या मुद्द्यांवर नंतर चर्चा होऊ शकते आणि सध्याची प्राथमिकता पंजाबमधील परिस्थिती सुधारणे ही आहे. सीमावर्ती राज्य असलेल्या पंजाबमधील सुरक्षा स्थिती अत्यंत नाजूक असून ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी आव्हान ठरू शकते, असे अकाली नेत्यांचे म्हणणे आहे.