Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथा आणि विदर्भातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथा आणि विदर्भातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट

0
Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथा आणि विदर्भातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट
rain

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन-पावसाच्या लपंडावानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता असून अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या बीकानेर, दिल्ली, लखनऊ, पाटणा मार्गे मणिपूरपर्यंत सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून सुमारे ०.९ किलोमीटर उंचीवर असल्याने राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

मंगळवारी पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/08/03/possibility-of-heavy-rainfall-across-the-country-due-to-western-disturbance-meteorological-department-issues-alerts-to-several-states/

याशिवाय पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. बुधवारीही विदर्भातील सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी ८ वाजता जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार, शहर आणि उपनगरांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील.

आज मुंबईत दुपारी ३:१७ वाजता ४.११ मीटरची भरती, तर रात्री ९:२५ वाजता १.०६ मीटरची ओहोटी असेल. बुधवारी पहाटे ४:०९ वाजता भरती आणि सकाळी ९:३३ वाजता ओहोटीची नोंद होईल.

गेल्या २४ तासांत (३ ऑगस्ट सकाळी ८ ते ४ ऑगस्ट सकाळी ८) मुंबई शहरात ३.०६ मिमी, पूर्व उपनगरात ६.३१ मिमी आणि पश्चिम उपनगरात ४.१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने नागरिकांना, विशेषतः घाट परिसर आणि अतिवृष्टीच्या शक्यता असलेल्या भागांमध्ये, आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here