Home महाराष्ट्र ठाणे Ullhasnagar Fire : धुराचे लोट अन् नागरिकांचा आक्रोश : उल्हासनगरमध्ये इमारतीला भीषण आग, १० हून अधिक वाहने भस्मसात

Ullhasnagar Fire : धुराचे लोट अन् नागरिकांचा आक्रोश : उल्हासनगरमध्ये इमारतीला भीषण आग, १० हून अधिक वाहने भस्मसात

0
Ullhasnagar Fire : धुराचे लोट अन् नागरिकांचा आक्रोश : उल्हासनगरमध्ये इमारतीला भीषण आग, १० हून अधिक वाहने भस्मसात

उल्हासनगर : उल्हासनगरमधील गजबजलेल्या वीनस चौक परिसरात असलेल्या ‘आशालोक’ इमारतीत मंगळवारी अचानक झालेल्या भीषण अग्निकांडाने एकच खळबळ उडवून दिली. इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवरील मीटर बॉक्समध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग भडकली. काही क्षणांतच या आगीने अत्यंत रौद्ररूप धारण केले आणि ज्वाला दुसऱ्या तसेच तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरल्या. या दुर्घटनेत इमारतीच्या आवारात उभी असलेली १० हून अधिक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून ती जळून खाक झाली आहेत.

https://prahaar.in/2026/08/04/shocking-crime-in-haryana-female-teacher-brutally-stabbed-34-times-in-32-seconds-inside-school/

इमारतीत पसरला दाट धूर

मीटर बॉक्समधील आगीमुळे निर्माण झालेल्या प्रचंड आणि दाट धुराचे लोट वेगाने वरच्या मजल्यांच्या दिशेने पसरले. अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीचे जिने आणि कॉरिडॉर धुराने वेढले गेल्यामुळे रहिवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग उरला नाही. धुरामुळे श्वास गुदमरण्याची वेळ आल्याने अनेक नागरिक आपल्या फ्लॅटमध्येच तुंबून राहिले. इमारतीतून बचाव पथकासाठी आणि मदतीसाठी होणारा आक्रोश पाहून परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी तत्परतेने अग्निशमन दलाशी संपर्क साधला.

अग्निशमन दलाची धाव अन् शिडीच्या साहाय्याने रहिवाशांचा बचाव

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे तांडव आणि अडकलेल्या रहिवाशांची गंभीर परिस्थिती पाहून जवानांनी विनाविलंब बचावकार्य सुरू केले. इमारतीच्या बाहेरून उंच शिडी लावून दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना अत्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेले हे शौर्य आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

४९ फ्लॅट्सची इमारत अंधारात

एकूण ४९ फ्लॅट्सचा समावेश असलेल्या या मोठ्या आशालोक इमारतीत आग अधिक पसरू नये आणि सुरक्षितता कायम राहावी यासाठी वीज प्रशासनाने संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठा तातडीने खंडित केला. आग पूर्णपणे आटोक्यात आली असली तरी वीज कापल्यामुळे सध्या रहिवाशांना अंधारात आणि गैरसोयीचा सामना करत राहावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पर्यायी किंवा तात्पुरता वीजपुरवठा सुरू करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्रस्त रहिवाशांकडून केली जात आहे. दरम्यान, पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून आगीच्या दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू असून नुकसानीचा अचूक अंदाज बांधण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here