नवी दिल्ली : हॉकी इंडियाने जपानमधील ऐची-नागोया येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी २० सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. स्टार डिफेंडर आणि ड्रॅग-फ्लिक विशेषज्ञ हरमनप्रीत सिंग संघाचे कर्णधारपद भूषवणार असून, अनुभवी मिडफिल्डर मनप्रीत सिंग उपकर्णधार असेल.

भारत गतविजेता आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२३ च्या हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले होते. यावेळी, विजेतेपद कायम राखणे आणि लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळवणे हे संघाचे ध्येय असेल.

मोहित एचएस आणि सूरज करकेरा गोलरक्षणाची जबाबदारी सांभाळतील. बचावफळीत जरमनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित आणि यशदीप सिवाच यांचा समावेश आहे. राजिंदर सिंग, राज कुमार पाल, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, नीलाकांत शर्मा आणि विवेक सागर प्रसाद हे मिडफिल्डमध्ये संघाचे नेतृत्व करतील. दिलप्रीत सिंग, शिलानंद लाक्रा, सुखजीत सिंग, मनदीप सिंग आणि अभिषेक हे आक्रमणाचे नेतृत्व करतील.

भारतीय संघाला यजमान जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, श्रीलंका आणि इंडोनेशिया यांच्यासोबत ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. भारत २० सप्टेंबर रोजी इंडोनेशियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर संघ २२ सप्टेंबर रोजी श्रीलंका, २४ सप्टेंबर रोजी दक्षिण कोरिया, २६ सप्टेंबर रोजी जपान आणि २८ सप्टेंबर रोजी बांगलादेशचा सामना करेल.

संघ निवडीबद्दल बोलताना मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले की, हा एक अत्यंत अनुभवी संघ आहे आणि सर्व खेळाडूंचे ध्येय आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे आहे.कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला की, संघातील प्रत्येक खेळाडूवर त्याचा पूर्ण विश्वास आहे. तो म्हणाला की, युवा आणि अनुभवी खेळाडूंचा उत्तम समतोल ही संघाची सर्वात मोठी ताकद आहे. खेळाडूंनी आपली जबाबदारी ओळखून कोणत्याही दबावाशिवाय सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे.