लंडन : हिंदी चित्रपटसृष्टीचे सदाबहार अभिनेते दिवंगत देव आनंद (Dev Anand) यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. देव आनंद यांचे सुपुत्र सुनील आनंद (Sunil Anand) यांचे अचानक निधन झाले आहे. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सोमवारी सकाळी लंडनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. नियतीचा अजब खेळ म्हणजे, २०११ मध्ये ज्या लंडनमधील रुग्णालयात देव आनंद यांनी अखेरचा श्वास घेतला होता, नेमक्या त्याच रुग्णालयात सुनील आनंद यांनीही जगाचा निरोप घेतला. या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
https://prahaar.in/2026/07/28/did-mahabharatas-draupadi-invent-pani-puri/
पुतणी जीना नारंग यांनी व्यक्त केल्या भावना : “कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा”
सुनील आनंद यांच्या निधनाची माहिती त्यांची पुतणी जीना नारंग यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्या म्हणाल्या, “सुनील काकांच्या अचानक जाण्याने आमचे संपूर्ण कुटुंब प्रचंड आघातामध्ये आहे. या कठीण प्रसंगात अनेक जण आम्हाला धीर देत आहेत, प्रार्थना करत आहेत, त्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. मात्र, या दुःखाच्या काळात कुटुंबाला सावरण्यासाठी सर्वांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, ही नम्र विनंती.”
लेखिका अनीता पद्दा यांच्याकडून निधनाला दुजोरा
प्रसिद्ध लेखिका अनीता पद्दा यांनीही या दुःखाद बातमीची पुष्टी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने सुनील यांचे निधन झाले. देव आनंद यांच्या निधनानंतर सुनील हे लंडनमध्येच स्थायिक झाले होते. त्या काळात ते तिथे एकटेच राहत होते. सध्या त्यांच्या निकटवर्तीयांशी आणि लंडनमधील नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दिग्गज आणि प्रसिद्ध चित्रपट घराण्याचा वारसा
सुनील आनंद यांचा जन्म देव आनंद आणि प्रसिद्ध अभिनेत्री कल्पना कार्तिक यांच्या पोटी झाला. त्यामुळे बालपणापासूनच त्यांच्यावर चित्रपटसृष्टीचे संस्कार झाले होते. केवळ वडीलच नव्हे, तर त्यांचे संपूर्ण कुटुंबच हिंदी सिनेमातील नावाजलेले नाव होते. त्यांचे काका चेतन आनंद आणि विजय आनंद (गोल्डी आनंद) हे भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक मानले जातात. याशिवाय दिग्दर्शक केतन आनंद, विवेक आनंद, प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर हे देखील त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. तसेच त्यांची आत्या नीलू यांचा विवाह दिग्गज अभिनेते नवीन निश्चल यांच्याशी, तर दुसरी आत्या अरुणा यांचा विवाह बलराज साहनी यांचे सुपुत्र अभिनेते परीक्षित साहनी यांच्याशी झाला होता.
अमेरिकेतून उच्च शिक्षण, पण ओढ मात्र सिनेसृष्टीची
सुनील यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील प्रतिष्ठित ‘अमेरिकन युनिव्हर्सिटी’मधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची (MBA) पदवी प्राप्त केली होती. परदेशात उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्यांना वडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते. त्यामुळे त्यांनी ग्लॅमरच्या जगात पाऊल ठेवले.
अभिनयातील अपयश: वडिलांसारखी जादू चालवता आली नाही
१९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आनंद और आनंद’ या चित्रपटातून सुनील यांनी मुख्य अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. विशेष म्हणजे या चित्रपटात राखी, स्मिता पाटील आणि बिस्वजित चॅटर्जी यांसारखे दिग्गज कलाकार होते आणि स्वतः देव आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मात्र, इतकी मोठी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. त्यानंतर सुनील यांनी ‘कार थीफ’, ‘मैं तेरे लिए’ आणि ‘मास्टर’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम करून आपले नशीब आजमावले. परंतु, प्रेक्षकांकडून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. वडिलांचे वलय आणि त्यांनी रचलेला इतिहास यांमुळे सुनील यांच्यावर नेहमीच अपेक्षांचे ओझे राहिले, पण त्यांना देव आनंद यांच्यासारखे अथांग यश आणि लोकप्रियता मिळवता आली नाही.