कल्याण : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या कल्याणमध्ये (Kalyan) एका धक्कादायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. एका बंद फ्लॅटमधून तब्बल अडीच महिने पाणी गळत असल्याची तक्रार शेजारी करत होते. मात्र, या गळतीमागील भयानक सत्य तेव्हा समोर आले, जेव्हा या घराच्या मालकाला त्याच्या भाडेकरू महिलेचा एक व्हॉईस मेसेज (Voice Note) आला. या एका मेसेजने कल्याण परिसरात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
पाण्याची गळती आणि उघडकीस आलेले सत्य
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कल्याणमधील ‘नीलकंठ सोसायटी’मध्ये ही थरारक घटना घडली. या सोसायटीतील फ्लॅट क्रमांक १०४ मधून सलग अडीच महिने सतत पाणी बाहेर येत होते, ज्यामुळे संपूर्ण पॅसेजमध्ये पाणी साचत होते. याबाबत सोसायटीतील रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या.
https://prahaar.in/2026/07/20/ramayana-part-1-trailer-leaked-before-official-release-makers-launch-anti-piracy-action/
घरमालकाला पाठवली ‘ती’ धक्कादायक व्हॉईस नोट
रहिवाशांच्या तक्रारीनंतर घरमालक अजय पाटील यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहणाऱ्या महिलेशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर, अचानक या महिलेने पाटील यांना एक व्हॉईस मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये तिने स्वतःच्या प्रियकराची हत्या केल्याची निर्ढावलेली कबुली दिली. एवढेच नाही, तर “मृतदेह बाथरूममध्ये ठेवला असून त्याची तुम्ही विल्हेवाट लावा,” अशी संतापजनक विनंतीही तिने घरमालकाला केली. हा मेसेज ऐकताच अजय पाटील यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली.
बाथरूममध्ये पोत्यात आढळला मृतदेह
माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फ्लॅटचा दरवाजा उघडून आत तपासणी केली असता, बाथरूममध्ये एका पोत्यात कोंबून ठेवलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मृत व्यक्तीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जोरदार वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. रक्ताचे डाग आणि हत्येचे इतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी महिलेने जाणीवपूर्वक बाथरूमचा नळ सुरू ठेवला होता. त्यामुळेच तब्बल अडीच महिने त्या घरातून पाणी बाहेर गळत होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी (Post-mortem) पाठवला आहे.
आरोपी महिला कोलकात्याला पसार, पोलिसांची पथके रवाना
या भीषण हत्याकांडाला अंजाम दिल्यानंतर आरोपी महिला थेट कोलकात्याला पळून गेल्याची माहिती पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे. तिच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके स्थापन केली असून, ती कोलकात्याच्या दिशेने रवाना झाली आहेत. या हत्येमागील नेमके कारण (Motive) अद्याप अस्पष्ट असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपी महिला हाती लागल्यानंतरच या हत्याकांडाचे संपूर्ण गूढ उकलण्याची शक्यता आहे.