Laila Khan Murder Case: बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका अभिनेत्रीसह तिच्या संपूर्ण कुटुंबाचे अस्तित्व अवघ्या एका रात्रीत संपवले जाईल, अशी सुतराम शक्यताही कोणी वर्तवली नसेल. चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणारी अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील ५ सदस्यांची झालेली अत्यंत क्रूर हत्या हे देशातील एक अत्यंत भीषण हत्याकांड मानले जाते. तब्बल १७ महिने एका फार्महाऊसच्या जमिनीखाली गाडला गेलेला हा काळा थरार जेव्हा उजेडात आला, तेव्हा संपूर्ण देश हादरून गेला होता.
https://prahaar.in/2026/07/20/cjp-protest-violence-violence-during-cjp-march-to-parliament-protesters-pelt-stones-near-parliament-street-several-police-personnel-including-a-delhi-police-sub-inspector-injured/
एका रात्रीत गायब झाले संपूर्ण कुटुंब
हे खळबळजनक प्रकरण २०११ सालातील आहे. अभिनेत्री लैला खान मुंबईतील ओशिवरा परिसरात राहत होती. एके दिवशी लैला, तिची आई सेलिना आणि कुटुंबातील इतर ४ सदस्य अचानक रहस्यमयी रीतीने बेपत्ता झाले. लैला खानने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वफा: ए डेडली लव्ह स्टोरी’ या चित्रपटात राजेश खन्ना यांच्यासोबत काम केले होते. संपूर्ण कुटुंब अचानक गायब झाल्यामुळे विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. अखेर लैलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली, त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.
https://prahaar.in/2026/07/20/postpone-travel-to-tehran-leave-iran-immediately-indian-embassys-advisory-to-citizens/
संशयाची सुई सावत्र वडिलांवर
मुंबई गुन्हे शाखेचे तत्कालीन अधिकारी अंबादास पोते यांनी या प्रकरणाच्या तपासाची धुरा सांभाळली होती. तपासादरम्यान पोलिसांना लैलाच्या मुंबईतील घरातून तिच्या सावत्र वडिलांचे, म्हणजेच परवेझ ताकचे ओळखपत्र हाती लागले. परवेझ ताक हा सेलिनाचा तिसरा पती होता. लैलाचे चित्रपटांमध्ये काम करणे परवेझला अजिबात मान्य नव्हते आणि त्यावरून कुटुंबात सतत मालमत्तेवरून वाद होत असत. परवेझने लैलाला कामासाठी दुबईला निघून जाण्याचा सल्ला दिला होता, जो तिने फेटाळून लावला होता. याच वादातून आणि रागातून परवेझने संपूर्ण कुटुंबाचा काटा काढण्याचा भयानक कट रचला.
https://prahaar.in/2026/07/20/hunger-strike-by-farmers-affected-by-the-nashik-ring-road-project-temporarily-suspended/
इगतपुरीच्या फार्महाऊसवरील शेवटची पार्टी
परवेझने आधीच इगतपुरी येथील कुटुंबाच्या फार्महाऊसवर आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीला सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर त्याने संपूर्ण कुटुंबाला काही दिवस सुट्ट्या घालवण्यासाठी तिथे जाण्यास तयार केले. फार्महाऊसवर पोहोचल्यावर सर्वांनी एकत्र जेवण केले, आनंद साजरा केला आणि सर्वजण गाढ झोपेत गेले.
मात्र, मध्यरात्री परवेझ आणि त्याच्या साथीदाराने लोखंडी रॉड तसेच सुऱ्याच्या साहाय्याने संपूर्ण कुटुंबावर अचानक जीवघेणा हल्ला केला. लैलाचा भाऊ इम्रान याने कुटुंबाला वाचवण्याचा निकराचा प्रयत्न केला, परंतु नराधम परवेझने कोणाचीही दयामाया न दाखवता सर्वांची अत्यंत निर्घृण हत्या केली.
https://prahaar.in/2026/07/20/pv-sindhu-to-lead-india-at-china-open-satwik-and-chirag-withdraw-due-to-injury/
पुरावा नष्ट करण्यासाठी आखलेला थंड डोक्याचा कट
गुन्ह्याचा कोणताही माग किंवा पुरावा मागे लागू नये, यासाठी परवेझने अत्यंत थंड डोक्याने नियोजन केले होते. फार्महाऊसवर स्विमिंग पूलसाठी खोदण्यात आलेल्या एका मोठ्या खड्ड्यात त्याने सर्व ६ मृतदेह पुरले. सुरुवातीला ३ मृतदेह खाली ठेवून त्यावर गाद्या व उशा टाकल्या, आणि त्यानंतर उर्वरित ३ मृतदेह ठेवून तो खड्डा मातीने पूर्णपणे बुजून टाकला. पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने त्याने कुटुंबाची एक कार थेट जम्मूमध्ये नेऊन लावली. अखेर पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त सहकार्याने त्याला बेड्या ठोकल्या.
https://prahaar.in/2026/07/20/narendra-modi-not-talking-about-the-56-year-old-youth-pm-modi-takes-a-dig-at-rahul-gandhi-without-naming-him/
१७ महिन्यांनंतर ते काळे सत्य उजेडात आले
अटकेनंतर कसून चौकशी केली असता परवेझने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. जेव्हा पोलीस इगतपुरीच्या फार्महाऊसवर पोहोचले, तेव्हा मुसळधार पावसामुळे खड्ड्यावरील माती काहीशी खचली होती. पोलिसांनी सलग ६ तास उत्खनन केल्यानंतर तिथून मानवी सांगाडे बाहेर काढले. वैद्यकीय तपासणीमध्ये ते सांगाडे लैला आणि तिच्या कुटुंबीयांचेच असल्याचे निष्पन्न झाले. तब्बल १७ महिने हा नरसंहार जगापासून पूर्णपणे लपून राहिला होता. तत्कालीन सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी परवेझ ताक हा अत्यंत चतुर आणि धोकादायक गुन्हेगार असल्याचे नमूद केले होते.
https://prahaar.in/2026/07/20/girish-mahajan-lashes-out-at-the-thackeray-pawar-factions-over-the-neet-protests/
न्यायालयाचा ऐतिहासिक आणि कठोर निकाल
मुंबई सत्र न्यायालयाने या खळबळजनक प्रकरणाचा निकाल देत मुख्य आरोपी परवेझ ताक याला ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ गुन्हा ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. न्यायसंस्थेने स्पष्ट केले की, हे कृत्य अत्यंत क्रूर आणि समाजाच्या सद्सद्विवेकबुद्धीला वेठीस धरणारे होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सामूहिक हत्या करून १७ महिन्यांपर्यंत पुरावे लपवून ठेवणे हे आरोपीच्या गुन्हेगारी मानसिकतेचे प्रतीक आहे. या संपूर्ण हत्याकांडात परवेझला मदत करणारा त्याचा सहआरोपी अजूनही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.