भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. गगनयानसारख्या देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी मोहिमांवर काम करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांनी अचानक राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. शास्त्रज्ञांच्या या वाढत्या गळतीमुळे अंतराळ विभाग (DoS) सतर्क झाला असून त्यांनी राजीनामा आणि स्वेच्छानिवृत्तीच्या (Voluntary Retirement) नियमांमध्ये मोठे आणि कडक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन आदेशात नेमकं काय म्हटलंय ?
१४ जुलै रोजी इस्रोच्या अंतर्गत काढण्यात आलेल्या एका नव्या आदेशानुसार, इस्रोच्या विविध केंद्रांच्या प्रमुखांना आता शास्त्रज्ञांचे राजीनामे थेट स्वीकारता येणार नाहीत. विशेषतः गगनयान आणि इतर राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमांमध्ये काम करणाऱ्या ‘गट अ’ (Group ‘A’) मधील वैज्ञानिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याला आता थेट अंतराळ विभागाकडून अंतिम मंजुरी घ्यावी लागेल. अनुभवी शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने संस्था सोडून जात असल्याने हा तातडीचा निर्णय घेण्यात आला आहे.
किती शास्त्रज्ञांनी सोडली इस्रो?
अंतराळ विभागाने अधिकृतरित्या राजीनामा दिलेल्या शास्त्रज्ञांचा आकडा जाहीर केलेला नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत तब्बल १०० ते १२० शास्त्रज्ञांनी इस्रोला रामराम ठोकला आहे. यामध्ये बेंगळुरू येथील यू. आर. राव सॅटेलाईट सेंटरमधील (URSC) सुमारे ८० शास्त्रज्ञ, तर तिरुवनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधील (VSSC) २० जणांचा समावेश आहे. हा आकडा यापेक्षाही जास्त असू शकतो आणि सध्या आणखी काही राजीनाम्यांवर विचार सुरू असल्याचे समजते.
मोठ्या अधिकाऱ्यांचाही राजीनाम्यात समावेश
सर्वात चिंतेची बाब म्हणजे राजीनामा देणाऱ्यांमध्ये अनेक वरिष्ठ आणि महत्त्वाच्या मोहिमांचे नेतृत्व करणाऱ्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे. यामध्ये LVM3 प्रकल्पाचे संचालक व्हिक्टर जोसेफ, URSC मधील स्पाडेक्स (SpaDeX) मोहिमेचे संचालक यांचा समावेश आहे. तसेच, ‘चांद्रयान-३’ मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि तब्बल १ लाखांहून अधिक सिम्युलेशन्सद्वारे चांद्रयानचे लँडिंग सुरक्षित करणारे प्रमुख शास्त्रज्ञ आदित्य रल्लापल्ली यांनीही इस्रो सोडली आहे.
इस्रो प्रमुखांची प्रतिक्रिया
या राजीनाम्यांबाबत इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन (V. Narayanan) यांनी दुजोरा दिला आहे, मात्र त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. “लोक संस्था सोडून जातात, हे कोणत्याही संस्थेत घडत असते. आमचा उद्देश केवळ त्यांना थांबवणे हा नाही, तर महत्त्वाच्या प्रकल्पांचे नुकसान होऊ न देणे हा आहे. एखादी व्यक्ती गेल्यास, दुसरी व्यक्ती ती जबाबदारी सांभाळेल. आम्ही याची योग्य ती काळजी घेत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पांना बसतोय मोठा फटका
नव्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, गगनयान आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करणाऱ्या ‘गट अ’ च्या अधिकाऱ्यांकडून स्वेच्छानिवृत्ती आणि राजीनाम्याचे अनेक अर्ज येत आहेत. यामुळे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामावर आणि वेगावर गंभीर परिणाम होत आहे.
केंद्राध्यक्षांचे अधिकार काढले
या नवीन आदेशामुळे नोव्हेंबर २०२० मध्ये लागू करण्यात आलेला एक नियम रद्द झाला आहे. पूर्वी इस्रोच्या केंद्र प्रमुखांना काही विशिष्ट पातळीपर्यंतच्या (Scientist/Engineer-SG) शास्त्रज्ञांचे राजीनामे मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले होते. मात्र, आता महत्त्वाच्या मोहिमा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही केंद्र प्रमुखाला हे राजीनामे स्वीकारता येणार नाहीत. त्यासाठी अंतराळ विभागाची परवानगी सक्तीची करण्यात आली आहे.
अनुभवी शास्त्रज्ञ टिकवण्याचे मोठे आव्हान
इस्रोमध्ये एकूण १४,६०० हून अधिक कर्मचारी काम करतात. त्या तुलनेत राजीनामा देणाऱ्यांचा आकडा छोटा वाटत असला तरी, हे सर्व शास्त्रज्ञ गगनयान, चांद्रयान आणि स्पाडेक्स यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या प्रकल्पांशी जोडलेले होते. त्यामुळे रिकाम्या जागा भरणे सोपे असले तरी, अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या या शास्त्रज्ञांची जागा घेणे अत्यंत कठीण आहे. इस्रोमध्ये सध्या १,०५० नवीन पदांची भरती सुरू आहे. मात्र, भविष्यातील भारतीय अंतराळ स्थानक आणि चंद्र मोहिमा यशस्वी करायच्या असतील, तर नवीन तंत्रज्ञानासोबतच या जुन्या आणि अनुभवी शास्त्रज्ञांना संस्थेत टिकवून ठेवणे ही काळाची गरज बनली आहे.