व्हिएतनाम : व्हिएतनाममधील ‘फू क्वोक’ बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भीषण दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शोकसंदेश जारी करत म्हटले आहे की, “व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांसोबत घडलेल्या या बोट दुर्घटनेची बातमी अत्यंत दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो.” तसेच, व्हिएतनाममधील भारतीय दूतावास (Embassy) आणि वाणिज्य दूतावास (Consulate) बाधित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत करत असून, ते व्हिएतनामच्या स्थानिक प्रशासनासोबत सातत्याने संपर्कात असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
१५ भारतीय पर्यटकांना जलसमाधी
पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी व्हिएतनाममध्ये गेलेल्या भारतीयांवर अचानक काळाने घाला घातला आहे. या मन हेलावून टाकणाऱ्या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल १५ भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका आनंदी सहलीचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
https://prahaar.in/2026/07/11/ketan-siya-case-a-major-twist-in-the-ketan-siya-case-is-there-a-possibility-of-siya-and-chetan-being-acquitted-due-to-this-reason/
किनाऱ्यापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर ओढवला अनर्थ
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या अपघातग्रस्त स्पीडबोटमध्ये एकूण ३६ जण प्रवास करत होते, ज्यामध्ये ३२ भारतीय पर्यटक आणि ४ बोट कर्मचाऱ्यांचा (क्रू मेंबर्स) समावेश होता. ही बोट व्हिएतनामचे सर्वात मोठे बेट असलेल्या ‘फू क्वोक’ जवळील ‘हॉन मे रुत न्गोई’ बेटाच्या परिसरातून जात असताना हा अपघात झाला. किनाऱ्यापासून अवघ्या ४०० मीटर (सुमारे १,३१० फूट) अंतरावर असताना ही बोट अचानक उलटली. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आंध्र प्रदेशातील तीन पर्यटक जखमी झाले असून, त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक बोटी आणि नौदलाची धडक मोहीम
हा थरार जवळून पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बोट उलटल्याचे दिसताच आजूबाजूच्या इतर बोटींनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच व्हिएतनामचे सीमा सुरक्षा दल, नौदल (Navy), तटरक्षक दल (Coast Guard) आणि इतर आपत्कालीन पथके या बचावकार्यात सामील झाली. मात्र, अनेक प्रवासी उलटलेल्या बोटीच्या आतच अडकून पडल्यामुळे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले होते.
खवळलेला समुद्र आणि वेगवान वारे ठरले अपघाताचे कारण ?
हा भीषण अपघात नेमका कसा आणि का घडला? याबाबत स्थानिक प्रशासनाकडून तपास सुरू आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, बचावलेल्या प्रवाशांची नेमकी आकडेवारी निश्चित करण्याचे काम अद्याप सुरू आहे. तसेच, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, समुद्रात अचानक वाहू लागलेले वेगवान वारे आणि उसळलेल्या उंचच उंच महाकाय लाटा (High Waves) यामुळे स्पीडबोट अनियंत्रित झाली असावी आणि परिणामी ती उलटली असावी. सद्यस्थितीत प्रशासन सर्वतोपरी मदतकार्य करत आहे.