नरेंद्र मोहिते
राजापूर तालुक्यासह कोकणातील अन्य ठिकाणी नव्याने प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पांच्या स्वागताची रोखठोक भूमिका मांडत पुन्हा एकदा राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी प्रकल्पविरोधकांना चांगलीच चपराक लगावली आहे. यापूर्वीही सन २००९ मध्ये राजापूर तालुक्यात जैतापूर येथे प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला प्रचंड विरोध असतानाही त्याचे जाहीर समर्थन करून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी साडेबावीस लाख रुपये अधिकचा मोबदला खा. राणे यांनी मिळवून दिला होता. खा. राणे यांनी आता कोकणात व राजापूर तालुक्यात बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन करत कोकणात औद्योगिक प्रगती झाली पाहिजे, असे प्रकल्प आलेच पाहिजेत, अशी रोखठोक भूमिका मांडत प्रकल्पाचे समर्थन केल्याने राजापूर तालुक्यातील जनतेतून तसेच प्रकल्प समर्थक जनता, विविध सामाजिक संघटना व स्थानिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे नेतृत्वच असे धाडस करू शकते, अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत असून खा. राणे यांच्या या समर्थनाच्या भूमिकेमुळे प्रकल्प समर्थकांच्या मागणीला बळ मिळाले आहे. विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे आमचे हक्काचे नेतृत्व म्हणजे खा. नारायण राणे अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत. खा. राणे यांनी या प्रकल्पाला विरोध करणारे हे व्यावसायिक विरोधक असल्याचा टोला लगावत कोकणात अशा प्रकारे प्रकल्प येणार असतील, तर त्याचे स्वागत झाले पाहिजे, आम्ही त्याचे स्वागत करू, अशी रोखठोक भूमिका मांडली.
कायमच विकासाची दूरदृष्टी ठेवून कोकण, राज्य आणि देशपातळीवर काम करणाऱ्या खा. राणे यांनी अशा विकासात्मक प्रकल्पांचे कायमच स्वागत केले आहे. कोणतीही पर्वा न करता व राजकीय फायदा-तोटा न बघता खा. राणे यांनी त्या त्या वेळी अशा प्रकल्पांचे जाहीर समर्थन केलेले आहे. जैतापूर येथे सन २००९ मध्ये प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला कमालीचा विरोध होता. मात्र त्यावेळीही खा. राणे यांनी त्याचे जाहीर समर्थन केले होते, तर या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्या शेतकऱ्यांना हरयाणा सरकारच्या धर्तीवर हेक्टरी साडेबावीस लाख वाढीव मदत मिळवून दिली होती. नाणार व बारसू येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पांचेही खा. राणे यांनी जाहीर समर्थन केले होते. राजापुरात येणाऱ्या प्रकल्पांना काही ठरावीक लोकांनीच कायम विरोध केला. यात उबाठा सेना कायमच आघाडीवर होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पांना कसा विरोध केला आणि पैसे घेऊन कसे गप्प बसले, हेखा. राणे यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितले. काही एनजीओ आणि त्यांचे प्रतिनिधी परदेशी फंडींगवर कायमच विरोधाची टिमकी वाजवत फिरत असल्याचे राजापूरकरांनी पाहिले आहे. त्यामुळे गेल्या १८ वर्षांत विविध प्रकल्पांना झालेल्या विरोधात आपण खूप काही गमावले असल्याची जाणीव आता राजापुरातील जनतेला झाली आहे. अशा प्रकल्पांच्या माध्यमातूनच कोकणच्या विकासाला नवी चालना मिळू शकते. मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल. तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि परिसरातील औद्योगिक विकासालाही गती मिळेल हा दृष्टिकोन ठेवून खा. राणे यांनी कायमच औद्योगिक प्रगतीला साथ दिली.
आता राजापुरात नव्याने प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाबाबत खा. राणे यांनी पुन्हा एकदा सकारात्मक भूमिका घेतल्याने त्यांच्या पूर्वीच्या पाठपुराव्याची आठवण प्रकल्प समर्थकांकडून करून दिली जात आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून विकासास गती देतानाच शेतकऱ्यांचे हित जपण्याची भूमिका खा. राणे यांनी सातत्याने घेतली आहे. आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत कोकणच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी काम केले असून, विकासाभिमुख नेतृत्व हीच त्यांची ओळख बनली आहे. खा. राणे यांनी कायमच पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगार आणि जनकल्याणकारी योजनांवर भर दिला.
कोकणच्या विकासासाठी बंदरे, महामार्ग, पर्यटन, मत्स्य व्यवसाय, उद्योग आणि विविध पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने राज्य व केंद्र सरकारकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासारख्या मोठ्या विकास प्रकल्पांबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. मात्र, विकासाबरोबरच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि त्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे, यासाठीही त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि कायमच खा. राणे यांच्या पाठपुराव्याची राज्य शासन असो वा केंद्र शासन असो दखल घेत असते. त्यामुळे खा. राणे यांनी ठरविले तर आज कोणतीही गोष्ट अशक्य नाही, अशा जनतेच्या भावना आहेत. राजापूरला विकासाच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर खा. राणे यांच्यासारख्या ठाम भूमिकेची आणि नेतृत्वाची गरज असून खा. राणे यांच्या समर्थनाच्या भूमिकेमुळे प्रकल्प समर्थकांना बळ मिळाले असून भविष्यात पुन्हा एकदा या प्रकल्पाच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.राजकारणात मतभेद असू शकतात; परंतु विकासाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे आणि मोठे प्रकल्प परिसरात आणण्यासाठी प्रयत्न करणे, ही खा. नारायण राणे यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे ‘विकासाचे राजकारण’ हीच त्यांच्या राजकीय वाटचालीची खरी ओळख आहे. त्यामुळे खा. राणे यांनी पुन्हा एकदा अणुऊर्जा प्रकल्पाच्या समर्थनाच्या घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे प्रकल्प समर्थकांना बळ मिळाले असून राजापुरातील जनतेतून याचे स्वागत होत आहे.
(या लेखाचे लेखक राजापूरचे रहिवासी आहेत.)