मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे जोरदार कौतुक करत, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस हे देशाच्या संविधानानुसार आणि “राष्ट्र प्रथम” या भूमिकेतून काम करणारे अत्यंत खंबीर नेते आहेत. त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक विचारांशी कधीही तडजोड केली नाही, अशा शब्दांत बन यांनी फडणवीसांच्या राष्ट्रवादाचे कौतुक केले. याच वेळी संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका करताना बन म्हणाले की, केवळ सत्तेच्या मोहापायी काँग्रेससोबत युती करून हिंदुत्वाच्या मूळ विचारांना तिलांजली देणारे संजय राऊत हेच खरे ‘महाराष्ट्रद्रोही’ आहेत. ज्यांनी नेहमीच पाकिस्तान आणि औरंगजेबाबाबत मवाळ भूमिका घेतली, अशा लोकांनी देवेंद्र फडणवीसांसारख्या प्रगल्भ नेत्याला देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे धडे शिकवू नयेत, असा थेट टोला त्यांनी लगावला.
https://prahaar.in/2026/06/30/state-government-to-set-up-expert-committee-to-prevent-misuse-of-ai-smart-glasses/
संजय राऊत यांच्याकडून महायुती सरकारवर होणाऱ्या पक्षपाताच्या आरोपांचा खरपूस समाचार घेताना नवनाथ बन यांनी मविआ सरकारच्या काळातील विकासकामांच्या निधीच्या मुद्द्यावरून जोरदार दाखला दिला. मविआ सरकारच्या काळात भाजपच्या १०५ आमदारांना विकासकामांसाठी एक रुपयाचाही निधी देण्यात आला नव्हता, याची आठवण त्यांनी करून दिली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा संपूर्ण विकास ठप्प झाला होता, असा आरोप करत बन म्हणाले की, निधी वाटपात प्रचंड दुजाभाव करणाऱ्या राऊतांनी महायुती सरकारवर बोट ठेवण्यापूर्वी स्वतःच्या तत्कालीन कारभाराचे आणि पक्षपाती धोरणांचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
महिलांचा अपमान करणाऱ्यांनी सन्मानावर बोलू नये; राम मंदिरावरून दाखवला आरसा
नवनाथ बन यांनी महिला सुरक्षा आणि महिला सन्मानासारख्या संवेदनशील विषयांवरून संजय राऊत यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप केला. एका महिलेविरोधात कथित शिवीगाळ आणि धमक्यांच्या प्रकरणामुळे राऊत आधीच कायदेशीर अडचणीत आले आहेत. त्यामुळे महिलांच्या अधिकारांबाबत किंवा त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही भूमिका मांडण्यापूर्वी राऊतांनी स्वतःचे आचरण तपासावे, असा सल्ला बन यांनी दिला. तसेच, राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राऊतांना सुनावताना ते म्हणाले की, प्रभू श्रीराम आणि रामसेतूच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेससोबत जे राऊत आज बसले आहेत, त्यांना अचानक राम मंदिराचा पुळका आला आहे. मंदिरासंदर्भातील कथित आरोपांची चौकशी सुरू असताना, राम मंदिर आंदोलनाची सातत्याने खिल्ली उडवणाऱ्यांना देशातील रामभक्त कधीही माफ करणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी करण्यापूर्वी स्वतःचा राजीनामा द्या; बन यांचे थेट आव्हान
महायुतीच्या खासदारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या संजय राऊत यांच्या भूमिकेवर नवनाथ बन यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि त्यांना एक थेट आव्हान दिले. राऊत जेव्हा राज्यसभेवर निवडून गेले, तेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन शिवसेनेच्या आमदारांच्या मतांचा सर्वात मोठा आधार मिळाला होता. त्यामुळे नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या राऊतांनी आधी स्वतःच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि मगच इतरांच्या नैतिकतेवर बोलावे, असे बन म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला आणि महायुतीच्या विकासकामांना पूर्णपणे स्वीकारले असून, संजय राऊतांनी आता केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुरू असलेले आपले राजकीय नाट्य बंद करावे, असा टोलाही त्यांनी शेवटी लगावला.