सिर्फ एक बंदा काफी है’ हा एक अतिशय महत्त्वाचा आणि बोलका चित्रपट ओटीटीवर आहे. प्रत्येकाने तो जरूर पहावा. आसारामबापूंसारखी माणसे आपल्या देशात प्रत्येक दशकात निर्माण होतच राहतात, ही एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. नागरिक म्हणून आपणही याला जबाबदार आहोत. अनेक स्त्रियांचे शोषण केले जात असताना हा समाज अशांना डोक्यावर घेऊन नाचत असतो, त्यांचा ‘उदो, उदो’ करत असतो!
https://prahaar.in/2026/06/28/vat-purnima-2026-wear-a-saree-in-these-auspicious-colors-based-on-your-zodiac-sign-on-the-day-of-vat-purnima/
आत्ताच काही महिन्यांपूर्वी उजेडात आलेला मूर्ख भोंदूबाबा खरात याने कित्येक महिलांचे आयुष्य उध्वस्त केले. अनेक मोठमोठे मंत्रि-संत्रीही त्याचे चेले होते. एका अर्थाने ते त्याला संरक्षणही पुरवत होते, असे स्पष्ट झाले आहे. गोष्टी इतक्या थराला जाईपर्यंत समाज काय करत होता? आपल्या जवळपास असे काही संशयास्पद घडत आहे, हे खरेच कुणाला कळत नसावे का? विज्ञानयुगात राहत असताना, त्याचे सगळे फायदे घेत असताना माणसे इतकी हतबल का व्हावीत? गरिबीने त्रासलेला, हातावर पोट असलेला, शिक्षणाचा अभाव असलेल्या वर्गाचे अज्ञान एक वेळ समजू शकते, पण, सुशिक्षित(?), उच्चभ्रू समाजातील मंडळी जेव्हा अशांच्या जाळ्यात अडकतात तेव्हा खरोखरच मती गुंग होते. आपल्या शिक्षणाने आपल्याला काय दिले? याचा जराही विचार करू नये का? इतकी स्वमग्नता कुठून येते? या प्रकरणाच्या बळी असलेल्या महिलांचा विचार ज्यावेळी मनात येतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती अशी, की कुणा तिऱ्हाईत व्यक्तीला शरीर वापरायला देईपर्यंतचा प्रवास इतका सहज कसा काय असू शकतो? अजूनही आपल्या समाजात मध्यमवर्गीय समाजातील स्त्रिया किंवा मुली पटकन् कुणाचा हातही हातात घेत नाहीत. नवऱ्याबरोबर असतानाही खोलीच्या दारा-खिडक्यांच्या कड्या नीट लावलेल्या आहेत की नाही, हे तपासून बघतात. इतकंच काय, त्यावेळी त्यांना अंधारच हवा असतो. आजूबाजूला कुठलेही आवाज नको असतात. नवऱ्याबरोबरही त्या हळूहळू खुलतात. टीव्हीवर अचानक समोर प्रणयदृश्य आले, तरी पट्कन तिथून उठून जातात. (हल्ली या शक्यता खूपच वाढलेल्या आहेत !) हे सर्वात मोठ्या संख्येने असलेल्या मध्यमवर्गीय समाजातील लोकांबद्दलचे चित्र आहे. अशावेळी मनात प्रश्न डोकावतो, अशा स्त्रीचा एका तिऱ्हाईत माणसाशी शरीरसंबंध ही गोष्ट किती कठीण आहे. असावी. पण, मनाच्या प्रचंड दबावाखाली हे घडत असावे. त्या व्यक्तीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला वापरले जात असावे. अशा स्त्रियांचा मनातून राग जरी आला, तरी शेवटी त्यांची कीवच अधिक वाटते.
https://prahaar.in/2026/06/29/immediately-execute-the-death-sentence-of-the-accused-in-the-nasrapur-rape-case/
सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे यांच्या भाषणात एक शब्द ऐकला. त्या शब्दाने डोक्याला अक्षरश: झिणझिण्या आल्या. ‘स्कीन करन्सी’ हा तो शब्द. पैशांच्या थप्पीप्रमाणे एकमेकांना स्त्रिया पुरवायच्या, पैशांप्रमाणे त्या उपभोगायच्या, बुद्धी असलेला जीताजागता माणूस त्यासाठी वापरायचा. यात स्त्री-पुरुष सगळेच आले!! डोकं असूनही या साखळीचा एक भाग व्हायचे व स्त्रियांना ‘अपराधी’ ठरवायचे. यामध्ये पुरुषप्रधानता तर आहेच; पण ‘राजकारण’अधिक आहे!
प्रचंड पैसा मिळवून एखादा माणूस काय करतो? तर प्रचंड सत्ता, अधिकार उपभोगतो किंवा वस्तू आणि माणसे उपभोगतो. प्रचंड पैसा कुठून येतो? तर, आजच्या काळात ज्याच्याकडे राजकीय लागेबांधे असतात, त्याला कमी वेळात त्यामानाने खूप अधिक पैसा सहजी मिळतो. ज्याला झटपट खूप काही मिळवायचे असते, (यातही स्त्री-पुरुष दोघेही आहेत) त्याला अशा साखळ्यांची गरज भासते. अशी माणसे समाजात मुखवटे घालून फिरतात. समाजात दाखवायचा चेहरा एक आणि दुसरा खराखुरा क्रूर चेहरा. सद्सद् विवेकबुद्धी बाजूला सारून सारे काही झटपट मिळवता येते. त्याचा ‘ओव्हर-कॉन्फिडन्स’ ही येतो. एखादा माणूस काहीही श्रम न करता दहा-पाच वर्षात एकदम इतका श्रीमंत होतो की स्वतःच्या सुरक्षेसाठी तो दहावीस गुंड पोसू शकतो. राजकारणी अशांना जवळ करतात. हेच लोक ‘शाहू – फुले – आंबेडकरां’वरील भाषणालाही उपस्थित असतात, हे आपण बघतो. अभेद्य सत्ताकारण उलटवण्यासाठी आपलीही संघटित शक्ती कमी पडते. तरीसुद्धा वैयक्तिक आयुष्यात आपण सजग राहू शकू, इतके तर आपल्या हातात असतेच ना? आयुष्य हे खूप गुंतागुंतीचे असते व समस्याही कालानुरूप बदलत असतात.
पण, साध्या आयुष्यात आनंदाने जगणारे लोकही आजूबाजूला असतातच की. त्यांची मदत का घेऊ नये? स्वतःची बुद्धी गहाण टाकून नंतर पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा स्वतःला मदत करण्यासाठी समुपदेशनाचा, वाचनाचा, पुस्तकांचा आधार का घेऊ नये? खरे तर, हाच सर्वात कमी खर्चिक उपाय आहे. बुवाबाजी, ज्योतिषी, पत्रिका, कर्मकांड, भविष्य वगैरे… हे सगळे फोल आणि अतिखर्चिक उपाय आहेत. विवेकनिष्ठ विचारांची कास धरणे, त्यानुसार वागणे हा दीर्घ पल्ल्याचा मार्ग असला, तरी तोच शाश्वत आहे. आपल्या इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत, व्यक्ती आहेत, ज्यांच्या जीवनप्रवासाच्या वाचनाने आपल्याला आपलेच शहाणपण हाती लागते!