मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजनक स्थितीत असून शहरासमोरील पाणीपुरवठ्याचे आव्हान कायम आहे. जल अभियांत्रिकी विभागाच्या मास्टर कंट्रोल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत सर्व तलावांमध्ये मिळून केवळ ७.०८ टक्के वापरण्यायोग्य पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या एकूण १,०२,४६० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असून तलावांची एकूण साठवण क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर आहे. (Mumbai Water Supply)
अप्पर वैतरणा तलावाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. या तलावाची पातळी लोअर डेड लेव्हलच्या खाली गेल्यामुळे त्यामध्ये वापरण्यायोग्य पाणीसाठा शिल्लक नाही. या भागात केवळ ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मोडक सागरमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे. या तलावात १८.५० टक्के वापरण्यायोग्य पाणीसाठा असून परिसरात ६९ मिमी पाऊस झाला. तानसा तलावात १०१ मिमी पाऊस झाला असला तरी तेथे केवळ ०.४१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
मध्य वैतरणा तलावात ११.३६ टक्के वापरण्यायोग्य पाणी आहे. या परिसरात ७१ मिमी पावसाची नोंद झाली असून २३ जूनपासून येथून नियंत्रित पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातही केवळ ५.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या भागात ८८ मिमी पाऊस झाला आहे.
वेहर आणि तुळसी या लहान तलावांमध्ये तुलनेने समाधानकारक स्थिती आहे. वेहरमध्ये ४४.८३ टक्के, तर तुळसीमध्ये २१.१२ टक्के वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे.
मागील वर्षांच्या तुलनेत यंदाचा एकत्रित पाणीसाठा कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सूनचा जोर वाढणे आणि पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होणे मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.