बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणात सर्व संबंधितांवर समान कारवाई व्हावी आणि तपास निष्पक्ष व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. टाकळी गावात जाऊन त्यांनी विलास घुले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, या प्रकरणात काही आरोपींना अटक झाली असली तरी एका व्यक्तीवर अद्याप कारवाई झालेली नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणताही पक्षपात न करता सर्व संबंधितांची चौकशी करावी. कोणत्याही आरोपीला संरक्षण मिळत असल्याचा संशय निर्माण होणार नाही, याची खबरदारी तपास यंत्रणांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
https://prahaar.in/2026/06/26/devendra-fadnavis-and-uddhav-thackerays-joint-flight-journey/
न्यायासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
मुंडे यांनी सांगितले की, या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहेत. तसेच आवश्यक असल्यास हा मुद्दा विधिमंडळातही उपस्थित केला जाईल. पीडित कुटुंबाला न्याय मिळणे हेच सर्वात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे म्हटले की, तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही दोषी किंवा निर्दोष ठरवणे योग्य नाही. मात्र तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि कोणत्याही दबावाशिवाय झाला पाहिजे. तपासानंतर पुराव्यांच्या आधारे जो दोषी ठरेल, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.
https://prahaar.in/2026/06/26/john-abrahams-entry-into-cricket/
दरम्यान, विलास घुले हत्या प्रकरणात यापूर्वी अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. या प्रकरणात पुरवणी जबाबात काही नव्या नावांचाही उल्लेख झाल्याने तपासाची व्याप्ती वाढली आहे. पोलिसांकडून विविध पुरावे आणि जबाबांची पडताळणी सुरू असून पुढील कारवाई तपासाच्या निष्कर्षानुसार केली जाणार आहे.