Home ब्रेकिंग न्यूज Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत

Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत

0
Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत
Monsoon in Jalgaon

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाने मोठी ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात सरासरी १२३.७ मिलिमीटर पावसाची अपेक्षा असताना, आतापर्यंत केवळ १०.२ मिलिमीटर म्हणजेच अवघा ८.२ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात जून महिन्यात पावसाची तब्बल ९२ टक्के तूट असून, आगामी काळात पाणीटंचाईसह चारा टंचाईचे संकट गडद होत आहे.

https://prahaar.in/2026/06/22/lover-targets-mother-after-marriage-refusal/

पेरण्या खोळंबल्या, शेतकरी हवालदिल

दरवर्षी ७ जूनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होते. मात्र, २१ जून उलटूनही पावसाचा थेंबही पडलेला नाही. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे हवामानात बदल झाला असून, कोरड्या व उष्ण हवेमुळे मान्सूनची वाटचाल मंदावली आहे. शेतकऱ्यांनी खरिपाच्या हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करून ठेवली आहेत, मात्र पावसाअभावी पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. गतवर्षी याच काळात जिल्ह्यात सरासरी ४७.०६ टक्के पेरण्या झाल्या होत्या, परंतु यंदा ती आकडेवारी नगण्य आहे.

https://prahaar.in/2026/06/22/massive-fire-at-a-coaching-center-in-lucknow/

केवळ १० टक्के बागायती लागवड

ज्या ठिकाणी विहिरी किंवा सिंचनाची सोय आहे, अशाच काही मोजक्या ठिकाणी बागायत कपाशीची लागवड झाली आहे. चोपडा (२२.८%), भडगाव (१५.८%) आणि जळगाव (११.७%) यांसारख्या तालुक्यांत जेमतेम १०.०३ टक्के बागायती कपाशीची लागवड झाली आहे. उर्वरित १४ तालुक्यांत अद्याप कोणतीही पेरणी झालेली नाही. ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मूग, तूर आणि भुईमूग यांसारख्या प्रमुख पिकांची लागवडच झालेली नसल्याने खरिपाचा हंगाम हातचा जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

https://prahaar.in/2026/06/22/west-bengals-bold-budget-government-employees-dearness-allowance-increased-by-20-percent/

अन्नधान्य आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर

पाऊस लांबल्याचा थेट फटका अन्नधान्य उत्पादनावर होणार आहे. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ पिकांचेच नुकसान होणार नसून, पशुधनासाठी लागणाऱ्या चारा आणि वैरणीचा प्रश्नही गंभीर होणार आहे. पावसाची ही ९२ टक्क्यांची तूट भविष्यातील दुष्काळी संकटाची नांदी मानली जात आहे.

https://prahaar.in/2026/06/22/nashik-kumbh-mela-appointment-of-shrimant-ramkishordas-shastri/

प्रशासनाकडून काय अपेक्षा?

जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती पाहता, प्रशासनाने आता पाणीटंचाईचे नियोजन आणि चारा छावण्यांच्या शक्यतेबाबत तातडीने हालचाली करणे आवश्यक झाले आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने बळीराजा हतबल झाला असून, आता आभाळाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here