मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शनिवारी महाराष्ट्र लोकभवन येथे भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसह योगसत्रात सहभाग घेतला. यंदाचा योग दिन कार्यक्रम भारतीय तटरक्षक दलाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे, भारतीय तटरक्षक दल यावर्षी आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे. या योगसत्राला तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसेच महाराष्ट्र लोकभवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांनी योगाचा व्यापक प्रचार-प्रसार करावा तसेच जगासाठी दर्जेदार योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत, असे आवाहन केले.
https://prahaar.in/2026/06/21/international-yoga-day-fadnaviss-appeal-on-the-occasion-of-international-yoga-day-practice-yoga-stay-healthy/
योगाला आज जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याचे नमूद करताना राज्यपाल म्हणाले की, पूर्वी योगाचा अभ्यास प्रामुख्याने घरे, आश्रम आणि योग संस्थांपुरता मर्यादित होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर आज १५० हून अधिक देशांमध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जात आहे.
योग हा केवळ मानसिक आरोग्यासाठीच नव्हे, तर शारीरिक (Physical) आणि भावनिक स्वास्थ्यासाठीही अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांनी भारतीय तटरक्षक दलाच्या कार्याचेही कौतुक केले. १९७७ मध्ये स्थापन झाल्यापासून तटरक्षक दल राष्ट्रसेवेत महत्त्वपूर्ण योगदान देत असून आज ते भारताच्या सागरी सुरक्षा व्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ बनले आहे, असे त्यांनी नमूद केले.
https://prahaar.in/2026/06/21/yoga-is-a-force-that-unites-humanity-prime-minister-modis-message-to-the-world-on-international-yoga-day/
“समुद्रातील जीविताचे संरक्षण, मच्छीमारांची सुरक्षा, बेकायदेशीर कारवायांवर नियंत्रण तसेच किनारपट्टी सुरक्षेची जबाबदारी तटरक्षक दलाने प्रभावीपणे पार पाडली आहे. कठीण परिस्थितीतही अधिकारी आणि जवान अथक परिश्रम करून देशाचे समुद्र सुरक्षित आणि संरक्षित ठेवत आहेत,” असे राज्यपाल म्हणाले.
राज्यातील २९ विद्यापीठांचे कुलपती म्हणून आपण विद्यापीठांना योग क्षेत्रात उत्कृष्ट प्रशिक्षक घडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे अतिरिक्त महासंचालक एम. व्ही. पाठक तसेच महानिरीक्षक भीष्म शर्मा उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्यपालांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग व प्राणायाम सत्राचे मार्गदर्शन केले.