सोलापूर: परंडा-बार्शी मार्गावरील वारदवाडी परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात (Accident) खांडवी (ता. बार्शी) येथील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू (Death) झाला. अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे खांडवी गावावर शोककळा पसरली आहे. (Solapur Accident)
https://prahaar.in/2026/06/11/major-tragedy-in-beed-boat-carrying-devotees-capsizes-in-the-godavari-river-3-women-dead-many-injured/
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही शेतकरी 8 जून रोजी परंडा येथील साखर कारखान्यात उसाच्या बिलाबाबत चौकशी करण्यासाठी गेले होते. कारखान्यातील काम पूर्ण करून ते आपल्या होंडा दुचाकीवरून (एमएच 13 एफडी 7058) खांडवी गावाकडे परतत होते. यावेळी वारदवाडीजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. मृत शेतकऱ्यांची नावे सर्जेराव कोंडीबा पाटील (वय 60) आणि बाबासाहेब भागवत गव्हाणे (वय 55) अशी आहेत.
धडक इतकी भीषण होती की सर्जेराव पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या बाबासाहेब गव्हाणे यांना तातडीने बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली.
https://prahaar.in/2026/06/11/iran-us-war-news-massive-attack-on-an-oil-tanker-near-the-coast-of-oman-indian-crew-members-were-on-board/
अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून फरार वाहनाचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दिवसभर शेती आणि कारखान्याच्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या या दोन्ही शेतकऱ्यांचा रात्री अपघातात मृत्यू झाल्याने खांडवी गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.