स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ (Me savitribai Jyotirao phule) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. TRPच्या कारणामुळे वाहिनीने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला असून १४ जून रोजी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. अवघ्या १५२ भागांमध्ये मालिका गुंडाळण्यात आल्याने प्रेक्षकांसह कलाकारांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.
मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. यावेळी कलाकार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र अभिनेता आणि खासदार अमोल कोल्हे यांनी कलाकारांना धीर देत महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, स्टार प्रवाहवरील मालिका संपत असली तरी सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्या कार्याची गोष्ट थांबणार नाही.
https://prahaar.in/2026/06/09/will-stay-with-bjp-navneet-rana-rejects-ncps-proposal-ends-rajya-sabha-discussion/
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी 13 जूनपासून पुन्हा चित्रीकरण सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र हे चित्रीकरण कोणत्या वाहिनीवर किंवा कोणत्या माध्यमासाठी होणार आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे मालिका नव्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
अमोल कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये “१४ जूनला स्टार प्रवाहवरील प्रवास थांबेल, पण गोष्ट नाही. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा इतिहास अर्धवट राहणार नाही,” असे म्हटले आहे.
दरम्यान, मालिकेच्या अचानक झालेल्या समाप्तीमुळे प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. आता अमोल कोल्हेंच्या घोषणेनंतर या मालिकेच्या पुढील प्रवासाबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.