Home संपादकीय विशेष लेख शोषित महिलांच्या न्यायासाठी सिमाला प्रसाद

शोषित महिलांच्या न्यायासाठी सिमाला प्रसाद

0
शोषित महिलांच्या न्यायासाठी सिमाला प्रसाद

खाकीची चमक, सोज्वळ चेहरा आणि स्वप्नं साकार करण्याची अफलातून जिद्द, ही आहेत आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद यांची ओळख. मध्य प्रदेशच्या सिमाला यांनी स्व-अध्ययनातून आणि कोणत्याही कोचिंगशिवाय, खडतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय पोलीस सेवेत स्थान मिळवले. आपल्या अभिनयकौशल्याने त्यांनी बॉलिवूडमध्येही स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनीपासून आयपीएस अधिकारी बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, महिला आणि समाजातील पीडितांसाठी सतत संघर्ष करण्याची त्यांची कहाणी, त्यांच्याच शब्दांत…माझा जन्म मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे झाला. माझे वडील, डॉ. भागीरथ प्रसाद, एक वरिष्ठ आयएएस अधिकारी होते. नंतर ते खासदार आणि विविध राज्यांचे राज्यपाल झाले. माझी आई, मेहरुन्निसा परवेझ, हिंदी साहित्यातील एक प्रसिद्ध लेखिका आहेत. माझे व्यक्तिमत्त्व घडवण्यात माझ्या आईने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मी माझ्या अभ्यासात नेहमीच उत्कृष्ट होते. माझे प्राथमिक शिक्षण भोपाळमधील सेंट जोसेफ को-एड स्कूलमधून झाले. माझी आई मला नेहमी अभ्यास करून स्वावलंबी होण्यास सांगायची.डीएसपी होण्याबद्दल माझ्या वडिलांना संकोच वाटत होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर, मी भोपाळ येथील इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स इन हायर एज्युकेशन (IEHE) मधून बी.कॉम. आणि बरकतुल्ला विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. मला विद्यापीठात सुवर्णपदक मिळाले. मी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची (एमपीपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली. मला पोलिसात रुजू व्हायचे होते. माझी पहिली पोस्टिंग डीएसपी म्हणून झाली. त्यावेळी मी खूप बारीक असल्यामुळे मला पोलिसांचे काम जमणार नाही, अशी माझ्या वडिलांना भीती होती.

डीएसपी ते आयपीएस

मी नोकरी करत असतानाच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. मी कोणत्याही कोचिंग संस्थेची मदत घेतली नाही; मी स्वतःहून अभ्यास केला. मी नियमितपणे पुस्तके आणि वर्तमानपत्रे वाचायचे. पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा मी उत्तीर्ण झाले. मी २०१० च्या बॅचची आयपीएस अधिकारी झाले. त्यानंतर, समाजात बदल घडवून आणण्याचे तसेच गुन्हेगारीविरुद्ध ठामपणे लढण्याचे स्वप्न मी पाहिले. माझ्या कर्तव्याच्या पहिल्याच दिवशी, गंभीररीत्या भाजलेल्या एका महिलेचे प्रकरण समोर आले. तिचा जबाब घेण्यासाठी मी रुग्णालयाच्या बर्न वॉर्डमध्ये गेले. तेथे मी जे पाहिले ते पाहून मला धक्काच बसला. त्या महिलेने माझ्या डोळ्यांदेखत अखेरचा श्वास घेतला. ती हुंड्याची बळी ठरली होती. पुढे बेतुलमध्ये पोलीस अधीक्षक असताना, दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची केस माझ्याकडे होती. त्या मुलींवर बलात्कार झाला होता. एक ५ वर्षांची आणि दुसरी ६ वर्षांची होती. त्या मुली आम्हाला जंगलात अर्धमेल्या अवस्थेत सापडल्या. जेव्हा मी त्यांना रुग्णालयात पाहायला गेले, तेव्हा त्यांची अवस्था पाहून माझा संताप अनावर झाला. हे माझ्याकडील सर्वात कठीण प्रकरणांपैकी एक होते. त्या मुली इतक्या घाबरल्या होत्या की त्या बोलू शकल्या नाहीत. त्यांच्यासोबत काय घडले आहे हे त्यांना स्वतःलाही माहीत नव्हते.

आम्ही रात्रंदिवस काम करून अमरावतीमध्ये गुन्हेगाराला पकडले, पण त्या घटनेचा मुलींच्या मनावर जो खोल परिणाम झाला आहे, तो आयुष्यभर मी पुसून टाकू शकत नाही. अशा पीडित मुलींसाठी मी खासगी समुपदेशनाची व्यवस्था करते. बलात्कार आणि विनयभंगासारखे गुन्हे ही त्यांची चूक नाही, हे त्यांना समजवावे लागते. हा एक घृणास्पद गुन्हा आहे आणि त्यांना त्याची लाज वाटू नये.खटल्याच्या सुनावणीदरम्यान मी त्यांना एकटे सोडत नाही. सततच्या समुपदेशनातून मी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करते, जे कधीकधी माझ्यासाठी खूप अवघड ठरते. राजस्थानच्या सीमेवरील राजगड जिल्ह्यात बालविवाह मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. जेथे वयात येण्याआधीच मुलींचे ठरवले जाते. ज्याला ‘नत्रा’ म्हणतात आणि लग्नासाठी एक निश्चित रक्कमही ठरवली जाते, ज्याला त्यांच्या भाषेत ‘लढाईचे पैसे’ म्हटले जाते. माझी जेव्हा तिथे नियुक्ती झाली होती, तेव्हा मी या मुलींसाठी शिबिरे आयोजित केली. आम्ही अनेक बालविवाह थांबवले आणि मुलींना या दुष्टचक्रातून मुक्त केले. माझे वडील रतलामचे कलेक्टर होते. बंचडा नावाचा एक समाज आहे, जो प्रामुख्याने मध्य प्रदेशातील रतलाम, मंदसौर आणि नीमच जिल्ह्यांमध्ये आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये आढळतो. हा एक भटक्या आणि उपेक्षित समाज आहे. या समाजाच्या काही भागांमध्ये अशी एक परंपरा आहे, जिथे कुटुंबातील सर्वात मोठ्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले जाते आणि तिच्या कमाईतून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मानवाधिकार आणि महिला हक्कांच्या संदर्भात ही प्रथा फार पूर्वीपासून चिंतेचा विषय आहे.

माझ्या आईने अनेक मासिकांमध्ये याबद्दल लिहिले आहे. माझ्या वडिलांनी त्या मुलींना तिथून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी त्यांच्यासाठी वसतिगृहे बांधली, जेणेकरून जर त्यांना तिथे जाऊन शिक्षण घ्यायचे असेल, तर त्यांना सुविधा उपलब्ध होतील.मी माझ्या ‘शी गोज मिसिंग’ या पुस्तकात अनेक कठीण आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांबद्दल लिहिले आहे. त्यात मध्य प्रदेशातील बेपत्ता झालेल्या मुलींच्या आणि आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या सत्यकथा आहेत. या कथांपासून प्रेरणा घेऊन ‘द नर्मदा स्टोरी’ हा चित्रपट बनवला जात आहे. मी काही चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे, त्यामुळे या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मला या चित्रपटासाठी करारबद्ध केले आहे. मी त्यात प्रमुख भूमिका साकारत आहे. अभिनय ही माझी आवड आहे, पण खाकीला सर्वाधिक प्राधान्य आहे.