रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली-हर्णे बायपास परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजूर कुटुंबातील ४ वर्षीय सानवी गणपत राठोड हिचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Dapoli Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, राठोड कुटुंब दापोली-हर्णे बायपासवरील रस्ते बांधकामाच्या कामासाठी आले होते. सानवीचे आई-वडील कामात व्यस्त असताना त्यांनी तिला उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून रस्त्यालगतच्या झाडाखाली झोपवले होते. मात्र, याचवेळी एका अज्ञात वाहनाने झाडाजवळून जाताना चिमुकलीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली.
https://prahaar.in/2026/06/09/shiv-sena-leader-fired-upon-in-shrirampur-narrowly-escapes-as-the-shot-misses/
अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर जखमी झालेल्या सानवीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच बांधकाम आणि रस्ते प्रकल्पांवर काम करणाऱ्या मजुरांच्या लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून स्थानिक नागरिकांची चौकशी केली जात आहे. अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.