मंत्री नितेश राणे यांनी घेतली बैठक; ‘फ्लाय-९१’ विमान कंपनी देणार सेवा
MUMBAI : नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची बहुप्रतीक्षित विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी म्हणजेच १५ ऑगस्टपूर्वी प्रत्यक्ष सुरू होणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी ‘फ्लाय-९१’ या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चॅको यांच्यासोबत मंत्रालयात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत याविषयी आढावा घेतला. या नव्या विमानसेवेमुळे मुंबई आणि कोकणमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार असून, गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीत प्रामुख्याने कोकणच्या पर्यटन विकासाला आणि दळणवळणाला गती देण्यावर भर देण्यात आला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू करण्याचे नियोजन असून, कोकणचा सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन ‘फ्लाय-९१’ कंपनीतर्फे विशेष अतिरिक्त उड्डाणांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या विमानसेवेच्या यशस्वी संचालनासाठी आणि तांत्रिक पूर्ततेसाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य, परवानग्या आणि आर्थिक पाठबळ देण्याचे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला दिले.
https://prahaar.in/2026/06/07/narendra-modi-use-public-transport-modi-appeals/
१०० टक्के ‘व्हिजीएफ’ मंजुरीचा मोठा आधार
सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून नियमित विमान वाहतूक सुरू राहण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच (१७ मार्च २०२६ च्या मंत्रिमंडळ बैठकीत) १०० टक्के ‘व्हिजीएफ’ (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) सुविधेला मंजुरी दिली आहे. प्रादेशिक विमान वाहतूक अधिक परवडणारी व्हावी आणि विमान कंपन्यांना तोटा होऊ नये, यासाठी सरकारकडून हे फंडिंग दिले जाते. यापूर्वी सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे मार्गासाठी असा निधी दिला गेला होता. चिपी विमानतळाला ही १०० टक्के सवलत मिळाल्यामुळे आता ‘फ्लाय-९१’ कंपनीला कोणताही आर्थिक अडथळा न येता आठवड्याचे सातही दिवस नियमित आणि सातत्यपूर्ण सेवा देणे शक्य होणार आहे.
फायदा काय होणार?
नवी मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) हा विमान प्रवास सुरू झाल्यामुळे दोन्ही ठिकाणांमधील अंतर अवघ्या तासाभराचे राहणार आहे. हवाई कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. परिणामी, स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि हॉटेल व्यवसायाला मोठी चालना मिळेल.