Home ब्रेकिंग न्यूज Pratap Sarnaik : मराठी शिकण्यासाठी अमराठी चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे अनिवार्य

Pratap Sarnaik : मराठी शिकण्यासाठी अमराठी चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे अनिवार्य

0
Pratap Sarnaik : मराठी शिकण्यासाठी अमराठी चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे अनिवार्य
Auto Drivers Marathi Language

मुंबई : महाराष्ट्राच्या मातृभाषेचा सन्मान राखत आणि प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व आत्मीय करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या अमराठी चालकांसाठीच्या व्यवहारिक मराठी शिकवणी (Marathi Classes) वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मराठी भाषा शिकण्यासाठी अमराठी चालकांमध्ये दिसून येणारा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा आहे, असे गौरवोद्गार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काढले.

परिवहन विभागाच्या पुढाकारातून आणि कोकण मराठी साहित्य परिषद तसेच मुंबई साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १ जूनपासून मुंबई महानगर क्षेत्रात अमराठी चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे विशेष वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी तब्बल साडेचार हजारांहून अधिक शिक्षकांची फळी उपलब्ध करून देण्यात आली असून, अनेक रिक्षा व टॅक्सी संघटनांनीही सामाजिक बांधिलकी जपत या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

https://prahaar.in/2026/06/07/ind-vs-afg-test-india-on-the-verge-of-500-by-lunch-on-day-2/

शहरातील विविध भागांमध्ये चालकांच्या सोयीच्या वेळेनुसार वर्गांचे आयोजन करण्यात येत असून, या वर्गांमध्ये चालक स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून मराठी भाषेतील दैनंदिन संवाद, व्यवहारातील शब्दप्रयोग आणि प्रवाशांशी सुसंवाद साधण्याची कला आत्मसात करत आहेत. मराठी शिकण्याची त्यांची तळमळ आणि जिद्द ही महाराष्ट्राच्या भाषिक ऐक्याचे सुंदर प्रतीक ठरत आहे.

येत्या १५ ऑगस्टपर्यंत अमराठी चालकांना व्यवहारिक मराठी शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिलेल्या निर्देशानुसार १६ ऑगस्ट पासून प्रवाशांशी मराठीत संवाद साधून न शकणाऱ्या चालकांना परिवहन विभागाच्या कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अर्थात , या निर्णयाचे महत्त्व ओळखून विविध चालक-मालक संघटनांनी स्वतःहून पुढाकार घेत प्रशिक्षण वर्गांचे आयोजन सुरू केले आहे. शासन, साहित्य संस्था आणि वाहतूक क्षेत्रातील संघटना यांच्या समन्वयातून हे अभियान आता एका व्यापक लोकचळवळीचे स्वरूप धारण करत आहे.

https://prahaar.in/2026/06/07/bandra-garib-nagar-renovation/

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि माणुसकीच्या नात्यांचा सेतू आहे. अमराठी चालकांनी मराठी शिकण्यासाठी दाखविलेला उत्साह हा स्वागतार्ह असून, यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक स्नेहपूर्ण, सुसंवादी आणि विश्वासार्ह होईल. मराठीचा गोडवा सर्वांच्या ओठांवर आणि व्यवहारात यावा, हीच या उपक्रमामागची प्रेरणा आहे.”

मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच सामाजिक सलोखा आणि परस्पर संवादाची नवी दारे खुली करणारा हा उपक्रम राज्याच्या भाषिक एकात्मतेचा एक प्रेरणादायी अध्याय ठरत असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here