Home संपादकीय अग्रलेख बंडखोरांना महायुतीने गुंडाळले!

बंडखोरांना महायुतीने गुंडाळले!

0
बंडखोरांना महायुतीने गुंडाळले!
mahayuti

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी महायुतीने बंडखोरी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. इच्छुकांची समजूत काढत साम, दाम, दंड, भेद, राजकीय डावपेचांचा वापर करत, विशेषतः मराठवाड्यातील चार जागांवर संभाव्य बंडखोरीचे सावट असताना, विविध राजकीय समन्वय आणि आश्वासनांच्या जोरावर महायुतीने बहुतांश ठिकाणी अंतर्गत संघर्ष आटोक्यात आणला.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागांवर विजय मिळवण्यासाठी महायुतीने बंडखोरी रोखण्यावर विशेष भर दिला. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व राजकीय डावपेचांचा अवलंब करण्यात आला. राज्यातील १७ जागांपैकी चार जागा मराठवाड्यातील असून, या ठिकाणी काही बंडखोर उमेदवारांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र विविध राजकीय समन्वय आणि आश्वासनांच्या माध्यमातून या बंडखोरांना शांत करण्यात महायुतीला बऱ्याच प्रमाणात यश आले. विधान परिषद सदस्यांच्या रखडलेल्या निवडणुका कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणुकीची घोषणा होताच अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले. महायुतीच्या बहुतांश जागांवर त्यांच्या घटक पक्षांतील किंवा मित्रपक्षांतील इच्छुकांनीच बंडखोरी केल्याने नेतृत्वाची चिंता वाढली होती.

https://prahaar.in/2026/06/05/financial-aid-of-%e2%82%b910-lakh-each-for-the-kin-of-deceased-maratha-protesters/

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मराठवाड्यातील जागांबाबत संयुक्त बैठक घेऊन जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला. त्यानंतर महायुतीच्या मतदारांना अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी वारंवार निर्देश दिल्यानंतरही काही ठिकाणी बंडखोरी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेरीस नाराज इच्छुकांना विविध महामंडळांवरील पदांची आश्वासने देऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही काही भागांत विरोधकांना मतदार आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळाल्याचे दिसून आले. महायुतीने नांदेड मतदारसंघातून अमरनाथ राजुरकर, धाराशिव-लातूर-बीड येथे बसवराज माधवराव पाटील, छत्रपती संभाजीनगर – जालना येथून सुहास त्र्यंबकराव शिरसाट, तर परभणी – हिंगोली येथून सईद शेरगुल खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

https://prahaar.in/2026/06/05/financial-aid-of-%e2%82%b910-lakh-each-for-the-kin-of-deceased-maratha-protesters/

भाजपने विधान परिषदेसाठी मराठवाड्यात काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नव्याने आलेल्या चेहऱ्यांना संधी दिल्याची चर्चा सुरू आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना धक्का बसल्याची भावना व्यक्त होत असून, या निर्णयाबाबत पक्षांतर्गत असंतोष दिसून येत आहे. मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील जुने राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र महायुतीच्या राजकारणात हे दोन्ही नेते एकत्र आल्याने नांदेडच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

https://prahaar.in/2026/06/05/pune-lpg-cylinder-blast-kharadi/

काही दिवसांपूर्वी एकमेकांवर टीका करणारे हे नेते निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री संजय शिरसाट तसेच भाजपकडून होत असलेल्या अडचणींबाबत नाराजी व्यक्त केली. बैठकीदरम्यान सत्तार आणि शिरसाट यांच्यात वादही झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी भाजपवर कठोर टीका करणारे अब्दुल सत्तार यांनी पक्षातील परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपली भूमिका मवाळ केली.

https://prahaar.in/2026/06/05/pune-lpg-cylinder-blast-kharadi/

मराठवाड्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांतील प्रश्न तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद व विविध विकासनिधी याबाबतचा आढावा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. शिवसेनेला अधिक ताकद देण्याच्या दृष्टीने भाजपच्या तक्रारीवरही मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील बंडोबांना थंड करण्यात पक्षाला यश आले. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली झाल्या. राष्ट्रवादीच्या बंडखोरांवर वरिष्ठ पातळीवरून दबाव आणल्यामुळे या ठिकाणी वातावरण निवळले.

महाविकास आघाडीचे
डॉ. विवेक नावंदर आणि महायुतीचे सईद खान यांनी प्रचाराला वेग दिला आहे. परभणीत बंडखोर विजय जामकर यांच्यावर माघारीसाठी दबाव टाकण्यात आला, तर काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सुरुवातीला महायुतीने बंडखोरांना गांभीर्याने घेतले नाही; मात्र स्थानिक राजकीय समीकरणांमुळे परिस्थिती अनिश्चित राहिली आहे. धाराशिव-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघात नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सात अपक्षांचे अर्ज वैध ठरले. यापैकी काही अपक्ष महाविकास आघाडीशी संबंधित मानले जातात. अखेरच्या टप्प्यात अनेक अपक्ष माघार घेतील, असा अंदाज आहे. मराठवाड्यातील चारही जागा महायुतीने प्रतिष्ठेच्या केल्या असून बंडखोरांना शांत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद दिसून आले असले, तरी विजय हेच अंतिम लक्ष्य असल्याने बंडखोरांना आटोक्यात आणण्यात महायुतीला यश मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

___डॉ. अभयकुमार दांडगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here