दिल्लीतील एका गेस्ट हाऊसमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर तपास यंत्रणांनी चौकशीची गती वाढवली आहे. या दुर्घटनेत निष्पाप २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी हॉटेल मालक लवकेश बजाज याला अटक केली आहे. चौकशी दरम्यान हॉटेल मालकाने अनेक खुलासे केले त्यामुळे प्रशासनासमोर आणखी नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या हॉटेल मालकाने चौकशीदरम्यान सांगितले की, आग लागल्यानंतर इमारतीत अडकलेले लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, परिस्थिती पाहून तो घाबरला आणि मदतीसाठी थांबण्याऐवजी तेथून निघून गेला. त्याच्या या कबुलीमुळे तपासाला नवे वळण मिळाले आहे.
https://prahaar.in/2026/06/04/airport-rules-important-notice-for-those-filming-reels-and-taking-selfies-at-the-airport-action-may-be-taken-for-violating-rules/
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने काही वर्षांपूर्वी ही इमारत खरेदी केली होती. त्यानंतर त्या ठिकाणी गेस्ट हाऊस सुरू करण्यात आले. मात्र, परवानगीपेक्षा अधिक खोल्या चालवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. अधिकृत परवानगी मर्यादित खोल्यांसाठी असताना प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर खोल्यांचा वापर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
तपासादरम्यान हॉटेलचे दैनंदिन व्यवस्थापन दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात इतर संबंधित व्यक्तींची भूमिकाही तपासली जात आहे. पोलिसांकडून हॉटेलच्या परवानग्या, सुरक्षा व्यवस्था आणि अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का याची चौकशी सुरू आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे विविध यंत्रणांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पोलिसांनी हॉटेल मालकाला न्यायालयात हजर करण्याची तयारी केली असून पुढील चौकशीसाठी कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. आग लागण्याचे नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.