Nashik : शासकीय धान्य गोदामांमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नाशिकरोड येथील (Nashik Road) शासकीय धान्य गोदामात काम करत असताना एका माथाडी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे कामगार वर्गात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कामगाराचे नाव अनिरुद्ध कारभारी बर्वे (वय अंदाजे ४५ वर्षे, नोंदणी क्र. ७८७५) असे आहे. ते नाशिक माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ अंतर्गत टोळी क्रमांक १९८ मध्ये नोंदणीकृत कामगार होते. नाशिकरोड येथील शासकीय धान्य गोदामात ते लोडिंग व अनलोडिंगचे काम करत होते. गुरुवार, दि. २८ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास गोदामात ट्रक लोडिंगचे काम सुरू होते.
https://prahaar.in/2026/05/30/nashik-residents-will-now-be-able-to-travel-to-mumbai-pune-and-hyderabad-in-just-two-hours-but-how/
क्षुल्लक कारण , दारात मरण
धान्य दीर्घकाळ सुरक्षित राहावे व त्याला कीड लागू नये यासाठी गोदामात आणि धान्याच्या पोत्यांवर मोठ्या प्रमाणावर रासायनिक पावडरची फवारणी करण्यात येते. ही पावडर गोदामाच्या फरशीवर आणि परिसरात साचल्याने मोठ्या प्रमाणावर घसरडी परिस्थिती निर्माण झाली होती. याच पावडरवरून अनिरुद्ध बर्वे यांचा पाय घसरल्याने ते जोरात खाली पडले. पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नाशिकरोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनने (Maharashtra State Mathadi Workers Union) प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. युनियनने नाशिक माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांना पत्र पाठवून या दुर्घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी रासायनिक पावडरचा वापर केला जातो; मात्र त्यामुळे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात का येत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
पावडर फवारणीनंतर आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षा उपाययोजना का केल्या जात नाहीत, अशी विचारणाही करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या धान्याची साठवणूक असलेल्या शासकीय गोदामांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना अँटी-स्लिप सुरक्षा बूट, हेल्मेट आणि इतर आवश्यक सुरक्षा साहित्य पुरवले जाते का, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/05/30/nashik-crime-news-bait-of-6-returns-in-the-stock-market-40-people-including-lawyers-officers-government-employees-cheated-of-crores-two-brothers-arrested/
योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवणार
मृत कामगाराच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत, विमा लाभ तसेच शासनाच्या नियमांनुसार सर्व प्रकारचे हक्क देण्यात यावेत.जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय व मदत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सर्व हमाल कामगार काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे शासकीय धान्य गोदामातील सर्व हमाल कामगारांनी स्पष्ट केले. संबंधित कामगाराचे निधन हे कामाच्या ठिकाणी व काम करत असताना झालेले आहे.
आजपर्यंत माथाडी कामगार संघटना, हमाल ठेकेदार तसेच शासकीय यंत्रणा यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सहानुभूती, आर्थिक मदत किंवा योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे सर्व हमाल कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याबाबचे निवेदन उपयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक, जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, धान्य वितरण अधिकारी, सचिव, माथाडी मंडळ, नाशिक गोदाम व्यवस्थापक, शासकीय धान्य गोदाम यांना पाठिवण्यात आले आहेत.